मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला २७ मेपासून सुरुवात, परीक्षा केंद्रांवर 'एआय'ची कडक नजर

एआय तंत्रज्ञानामुळे मानवी देखरेखीची गरज कमी होईल आणि रिअल-टाइम अलर्ट्सद्वारे गैरप्रकार तात्काळ रोखता येतील. प्रायोगिक यशस्वी झाल्यास भविष्यात सर्व ५५८ केंद्रांवर ही प्रणाली विस्तारित केली जाईल.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला २७ मेपासून सुरुवात, परीक्षा केंद्रांवर 'एआय'ची कडक नजर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) उन्हाळी सत्र परीक्षेला येत्या २७ मेपासून सुरुवात (Exams Start on May 27) होणार आहेत. या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि पूर्णपणे गैरप्रकारमुक्त (Malpractice-free Examination) व्हावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर एआय (Artificial Intelligence) आधारित सीसीटीव्ही देखरेख प्रणाली राबवली जाणार आहे.  हा उपक्रम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

उन्हाळी सत्र परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ५५८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तीन स्तरांवर कठोर देखरेख ठेवण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक ८४ परीक्षा केंद्रांवर प्रत्येक वर्गखोलीत एआय-आधारित इंटेलिजेंट कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे केवळ रेकॉर्डिंग करणार नाहीत तर संशयास्पद हालचाली, असामान्य वर्तन किंवा गैरप्रकार ओळखण्याची क्षमता असलेल्या AI अल्गोरिदमने सुसज्ज असतील. प्रश्नपत्रिका डाउनलोड करून डिजिटल प्रिंट काढण्यापासून ते उत्तरपत्रिका जमा करणे, सील करणे आणि सुरक्षित ठेवण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही निगराणी राहील. 

या उपक्रमामुळे परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल, असे असा विश्वास कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. मुक्त विद्यापीठात दूरस्थ शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी विविध पार्श्वभूमीतून येतात. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि शंकामुक्त वातावरण निर्माण करणे याला विद्यापीठाचे प्राधान्य राहिले आहे. 

एआय तंत्रज्ञानामुळे मानवी देखरेखीची गरज कमी होईल आणि रिअल-टाइम अलर्ट्सद्वारे गैरप्रकार तात्काळ रोखता येतील. प्रायोगिक यशस्वी झाल्यास भविष्यात सर्व ५५८ केंद्रांवर ही प्रणाली विस्तारित केली जाईल. विद्यापीठाने परीक्षा केंद्र प्रमुख, निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचेही नियोजन केले आहे.

या निर्णयामुळे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांची विश्वासार्हता वाढेल आणि पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांशी तुलना करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनीही नियमांचे पालन करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठाडून करण्यात आले आहे.