एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला
तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानात तुम्हाला यश मिळो, याच तुम्हाला सदिच्छा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल (Results) जाहीर झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी खास पोस्ट करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. याबरोबरच एक परीक्षा तुमचे भविष्य ठरवू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीएसई दहावीचा निकाल ९३.६६ टक्के लागला आहे तर बारावीच्या परीक्षेत यंदा एकूण ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. जिद्द, शिस्त आणि मेहनतीचे हे फळ आहे. या यशात योगदान देणाऱ्या पालक, शिक्षक आणि इतर सर्वांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानात तुम्हाला यश मिळो, याच तुम्हाला सदिच्छा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
त्याचबरोबर या परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की, एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवत नसते. तुमचं आयुष्य यापेक्षा मोठं आहे आणि गुणपत्रिकेच्या पलिकडे तुमची ताकद आहे. आत्मविश्वासू राहा, उत्सुक राहा कारण चांगल्या गोष्टी तुमची वाट पाहत आहेत”, असंही ते म्हणाले आहेत.

