CHB प्राध्यापकांची भरतीच्या नावाखाली फसवणूक? कॉलेजमधील विद्यार्थी वाऱ्यावर
राज्यातील पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती प्रक्रियेला अद्याप म्हणावी, तशी गती मिळालेली नाही. त्यात अनेक महाविद्यालयांमध्ये अद्याप सीएचबी धारक प्राध्यापक रुजू झालेले नाहीत. काही महाविद्यालयांनी सीएसबी पदांसाठी केवळ अर्ज मागवले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील महाविद्यालयांमधील सुमारे 5000 प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही अनेक महाविद्यालयांची रोस्टर तपासणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यात महाविद्यालये सुरू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला असला तरीही अनेक महाविद्यालयांमध्ये अद्याप CHB धारक प्राध्यापकांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे पूर्णवेळ प्राध्यापकांच्या भरतीच्या नावाखाली CHB धारकांची फसवणूक केली जाते का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्यातील सर्व पारंपरिक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू झाली. जून महिन्यातच सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. राज्यातील पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती प्रक्रियेला अद्याप म्हणावी, तशी गती मिळालेली नाही. त्यात अनेक महाविद्यालयांमध्ये अद्याप सीएचबी धारक प्राध्यापक रुजू झालेले नाहीत. काही महाविद्यालयांनी सीएसबी पदांसाठी केवळ अर्ज मागवले आहेत.प्राप्त अर्जाच्या आधारे मुलाखती घेऊन नियुक्ती करावी लागणार आहे,त्यास आणखी काही दिवस लागणार आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गात बसून शिक्षण घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

महाविद्यालयांमध्ये केवळ प्रथम वर्षाचे विद्यार्थीच नाही तर द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेतात. त्यामुळे काही महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यासाठी पूर्ण वेळ सोडा सध्या सीएसबी धारक प्राध्यापक सुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर अनेक नवीन विषय विद्यार्थ्यांना शिकवावे लागतात. त्यामुळे वेळेत वर्ग सुरू होणे आवश्यक आहे. परंतु, विद्यार्थी संख्येच्या आधारे सीएसबी धारकांची मान्यता या गोंधळात जुलै महिना संपत आला तरी अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नियुक्तीच झालेली नाही.
राज्य शासनातर्फे वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार साधारणपणे जुलै महिना अखेरपर्यंत सीएसबीधारक प्राध्यापकांची नियुक्ती होऊन त्यांना विद्यापीठातर्फे ॲप्रूव्हल मिळणे अपेक्षित आहे. मात्र, ॲप्रूव्हल तर सोडाच अद्याप प्राध्यापकांची नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे पूर्णवेळ प्राध्यापक भरतीच्या नावाखाली सीएचबी धारकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप प्राध्यापक संघटनांकडून केला जात आहे.

----------------
राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेला अद्याप गती मिळालेली नाही. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले आहे. यापूर्वी जून महिन्यामध्ये सर्व पदे भरले जातील, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, अजूनही अनेक महाविद्यालयांच्या रोस्टर तपासणीचा प्रश्न सुटलेला नाही. सीएचबी धारकांची पदे सुद्धा महाविद्यालयांमध्ये भरली गेलेली नाहीत. त्यामुळे शासन विधारकांची फसवणूक तर करत नाही ना ?अशी शंका निर्माण होते.
-डॉ. संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटना