उधाणलेल्या आव्हानांतूनच यशाचा किनारा गाठता येतो : तुषार लुंकड

तुषार लुंकड यांनी आपल्या मनोगतात शाळेतील विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत, मोठी स्वप्ने पाहण्याचे, सातत्य, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.

उधाणलेल्या आव्हानांतूनच यशाचा किनारा गाठता येतो : तुषार लुंकड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथे गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थी ‘गुणगौरव’ समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा उद्योग निरीक्षक तुषार लुंकड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत, "शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी घडवत नाही; उधाणलेल्या आव्हानांतूनच यशाचा किनारा गाठता येतो," असे प्रतिपादन केले.

संस्थेचे नियामक मंडळ सदस्य व शाळा समिती अध्यक्ष अजय पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दहावी व बारावीच्या विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थी, राज्य शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम.एम.एस. तसेच प्राथमिक विभागातील मंथन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या एकूण ७० विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यंदा विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.७८ टक्के लागला असून बारावी विज्ञान शाखेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. कला शाखेचा निकाल ८२.६० टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९५.४५ टक्के लागला. नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तसेच मंथन परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे तुषार लुंकड यांनी आपल्या मनोगतात शाळेतील विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत, मोठी स्वप्ने पाहण्याचे, सातत्य, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच पालक आणि शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी गुरुपौर्णिमा आणि गुणगौरव समारंभाचा योग विशेष असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय यश मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय समारोपात अजय पुरोहित यांनी, "यश हा प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे; तो अंतिम पूर्णविराम नाही," असे सांगत विद्यार्थ्यांनी ज्ञान, आदर्श आणि योग्य कृती यांच्या बळावर राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी केले. यावेळी महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका सविता हिले, पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता तावरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय लखे, पर्यवेक्षक श्याम नांगरे व संदीप पवार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेळके यांनी केले, तर रवींद्र गडकर यांनी आभार मानले. राष्ट्रसंत ज्ञानेश्वर माउलींच्या *'पसायदान'*च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.