म. ए. सो. मुलांचे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; ‘कृतज्ञता निधी अभियानाचा’ प्रारंभ

म. ए. सो. मुलांचे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; ‘कृतज्ञता निधी अभियानाचा’ प्रारंभ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

म. ए. सो. मुलांचे विद्यालय, पुणे येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, शालेय पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘कृतज्ञता निधी अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वसावे यांनी प्रास्ताविकात गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत गुरुपौर्णिमा ते शिक्षक दिन या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘कृतज्ञता निधी अभियानात’ माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक आणि माजी शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. गेल्या वर्षी या अभियानातून शाळेतील प्रयोगशाळेचे नूतनीकरण, भौतिक सुविधांचा विकास आणि मैदानावरील विविध कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व १९९४ च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री. निलेश जगदीश ठक्कर (सोनू भैय्या) यांचा परिचय श्री. कदम यांनी करून दिला. क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष श्री. शेठ यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी शिक्षिका तसेच शालेय पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी श्रीफळ, गुलाबपुष्प आणि पेन देऊन गौरव केला.

माजी शिक्षिका श्रीमती माधुरी मुळे यांच्या भावना व्यक्त करणारा पत्ररूपी संवाद पर्यवेक्षिका सौ. लिमये यांनी सादर केला. प्रमुख पाहुणे श्री. निलेश ठक्कर यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शालेय आठवणींना उजाळा दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, शिस्त, नियमित व्यायाम तसेच कबड्डी आणि बॉक्सिंगसारख्या खेळांचे महत्त्व पटवून दिले. शाळेसाठी आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

शाळा समिती अध्यक्ष श्री. शेठ यांनी विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेत असल्याचा अभिमान बाळगावा आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून जीवनातील ध्येय गाठावे, असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. वसावे, उपमुख्याध्यापिका सौ. पवार, पर्यवेक्षिका सौ. लिमये, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. दिपाली बधे यांनी केले.