TAIT EXAM:आता 'हे' उमेदवारही परीक्षेस पात्र; भावी शिक्षकांना संधी
डी.एड, बी. एड आणि एम. एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस पात्र असणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सध्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Examination Council) या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० मे पर्यंत देण्यात आली आहे. अशा परिस्थिती यंदा डी.एड, बी. एड आणि एम. एड (D.Ed, B. Ed and M. Ed students) च्या शेवटच्या सत्रात असलेल्या उमेदवारांची चिंता वाढली होती. मात्र, डी.एड, बी. एड आणि एम. एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस पात्र (Student Eligibility) असणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही विद्यापीठातील डी.एड, बी. एड आणि एम. एड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना केवळ २० दिवसांमुळे या परीक्षेपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरत होता. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
https://eduvarta.com/20-days-cause-huge-loss-to-future-teachers
परंतु अशा उमेदवारांचे शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीत प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नसून त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येणार आहे. डी.एड, बी. एड आणि एम. एड उमेदवारांनी त्याच वेळी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. या उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पद भरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. उमेदवारांनी गुणपत्रक सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे.