सर्पदंशाने तीन आदिवासी विद्यार्थिनींचे बळी; जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई

आदिवासी दिनाच्या रात्री शाळेतील एका खोलीत झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना सापाने चावले. त्यात तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर स्थिर आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्पदंशाने तीन आदिवासी विद्यार्थिनींचे बळी; जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द, संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत (Japtalai Ashram School) घडलेल्या भीषण सर्पदंश दुर्घटनेनंतर (Snake bite accident)  प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. आदिवासी दिनाच्या रात्री शाळेतील एका खोलीत झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना सापाने चावले. त्यात तीन चिमुकल्यांचा मृत्यू (Death of three female students) झाला तर तीन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर स्थिर आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द (School's recognition permanently revoked) करण्याचे आदेश दिले आहेत. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी संस्थाचालकांविरोधात फौजदारी कारवाईचे (Criminal action against the management of the institution) निर्देश दिले असून शाळेची तपासणी करून पात्र ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दुर्घटना रात्री दोन ते अडीच वाजता घडली. विद्यार्थिनी जेवणानंतर जमिनीवर झोपलेल्या असताना सापाने त्यांना दंश केला. विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील दीपिका लकडा आणि इयत्ता आठवीतील सुष्मिता मंडल यांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील अनु कोरेटी हिचाही मृत्यू झाला. सध्या इयत्ता पाचवीतील दीपिका मदवी, सहावीतील कविता किरंगा आणि आठवीतील समृद्धी नैताम यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी सुरेश नैताम हिची प्रकृती गंभीर आहे.

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी घटनास्थळी पाहणी केली असता विद्यार्थिनी ज्या खोलीत झोपल्या होत्या त्यामागे लाकडांचा मोठा ढीग आणि खिडकीजवळ विटांची थप्पी असल्याचे समोर आले. याच खिडकीतून सापाने खोलीत प्रवेश केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मूलभूत सुविधा, कर्मचारी संख्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था नसतानाही शाळेला मान्यता कशी मिळाली, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत मंत्र्यांनी कारवाईची घोषणा केली.
चौकशी अहवालानुसार आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट झाल्यानंतर धानोरा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भाष्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेने राज्यातील आश्रमशाळांमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताची अशी दयनीय व्यवस्था असतानाही तपासणी कशी पार पडली, याचीही चौकशी सुरू आहे.
प्रशासनाने आता कठोर भूमिका घेत शाळेची मान्यता रद्द केली असून दोषींवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. आदिवासी विद्यार्थिनींच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सरकारने अशा घटनांना रोखण्यासाठी आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. पीडित कुटुंबांना मदत आणि न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलली आहेत.