विद्येच्या माहेरघरातच सर्वाधिक असाक्षर; प्रशासनाने उचलले महत्वाचे पाऊल
'यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया 'उल्लास'च्या संगे!' अशी टॅगलाईन देऊनही राज्य कार्यालयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ६३ लक्ष एवढे असाक्षर आढळून आले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख ६७ हजार एवढे असाक्षर (Most illiterate Pune district)असून त्यांना साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव व नवरात्र उत्सव (Ganeshotsav and Navratri festival)या सारख्या सार्वजनिक उत्सवांचा उपयोग (Use of public festivals)करून घेण्याचे निश्चित केले आहे.यंदा पुणे जिल्ह्यास राज्याकडून ३८,०३८ इतके उद्दिष्ट एप्रिलमध्ये मिळाले. त्यापैकी ८ ऑगस्ट अखेर केवळ ६३ असाक्षरांची आणि शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या ३८०८ पैकी २२ स्वयंसेवकांची नोंदणी (Registration of volunteers)झाली आहे. म्हणजे कुठलीही ठोस कार्यवाही होत नसल्याने उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (Ulas Nav Bharat Literacy Programme)उत्तम पध्दतीने राबविण्यासाठी ही योजना राबविणाऱ्या योजना शिक्षण संचालनालयाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम योजावयास प्रारंभ केला आहे.
मागील वर्ष सन २०२३-२४ पासून १५ वर्षे व त्यावरील असाक्षरांसाठी उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम हा केंद्र शासनाचा सन २०२२ पासून सुरू झालेला कार्यक्रम महाराष्ट्र राज्यानेही स्वीकारला आहे. मागील वर्षी पुण्याला मिळालेल्या ६३,९५० उद्दिष्टापैकी केवळ १२,६८४ असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली. त्यातील ९,८०७ परीक्षेत बसले,पैकी ९,०४२ उत्तीर्ण झाले. एवढेच उद्दिष्ट साध्य करण्यास पुणे जिल्हा प्रशासनाला यश आले. विद्येचे माहेरघर, आयटी हब, सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे मिळवणाऱ्या पुण्याची सर्वाधिक असाक्षर असलेला जिल्हा म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. त्यातच गतवर्षी केंद्र शासनाने राज्यात पुणे व ठाणे जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याबाबत राज्य शासनास कळवले आहे.आषाढी वारी निमित्त निघणाऱ्या दोन्ही पालखी सोहळ्यात राबविलेल्या 'वारी साक्षरतेची' या उपक्रमास मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर गणेशोत्सव व नवरात्र उत्सव या सार्वजनिक उत्सवांकडे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी पुण्यासह सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राज्य योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्याबाबतची गांभीर्यता जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्या उपस्थितीत स्थायी समितीत याबाबत सविस्तर विवेचन केले. तर पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळाच्या पूर्वतयारी बैठकीत गणेश मंडळांनी चालू वर्षी साक्षरता या थीमवर देखाव्यासह उपक्रम घ्यावेत असे आवाहन केले.
या उल्लास कार्यक्रमाच्या जिल्हा नियामक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुढाकार घेत पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व तहसीलदारांना याबाबत आदेश काढून या दोन्ही उत्सवांमध्ये मंडळांमार्फत 'उल्लास'च्या प्रचारासाठी निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हा, तालुका यासह सर्व स्तरावर होणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मंडळाच्या पूर्वतयारी बैठकांमध्ये याबाबतचे महत्त्व विशद करण्याबाबत पोलीस प्रशासनासह सर्व प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध असल्याने या थीमवर आधारित गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी उपक्रम घेतल्यास उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल तर शक्य होईलच, मात्र सर्वाधिक असाक्षर असा लागलेला ठप्पाही पुसण्यास मदत होणार आहे. शिवाय या उपक्रमामुळे राज्यभर चांगला संदेश जाऊ शकेल. सन २०२७ पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्व विभागाच्या यंत्रणांना काम करावे लागणार आहे, तसेच कार्यक्रमाला लोकचळवळीचेही स्वरूप द्यावे लागेल.
उत्सव काळात उल्लास कार्यक्रमाचे बॅनर लावणे, साक्षरता कार्यक्रमावर आधारित जिवंत व अन्य देखावे, रांगोळी चित्रकला, गीत गायन यासारख्या स्पर्धा, नवसाक्षरांच्या मुलाखती व सत्कार, मंडळांनी आपल्या कुवतीप्रमाणे दहा,पन्नास,शंभर.. अशा संख्येत असाक्षरांना वर्षभरात साक्षर करणे, त्यासाठी मंडळ कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करणे, असे उपक्रम सुचवण्यात आले आहेत. शिवाय विविध संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीने उल्लास कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे वाटप करणेही शक्य आहे. 'यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया 'उल्लास'च्या संगे!' अशी टॅगलाईन देऊनही राज्य कार्यालयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पुण्याचे योजना शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, पुणे मनपा प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, पिंपरी चिंचवड प्रशासनाधिकारी संगीता बांगर यांनाही या प्रकरणी ठोस भूमिका बजावावी लागणार आहे. पुण्यातील मानाच्या गणेश मंडळासह सर्वच मंडळांना चालू वर्षासाठी महिनाभर अगोदरच एक उत्कृष्ट विषय-थीम मिळाल्याने तेही या संधीचा कितपत उपयोग करून घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या योजनेत शाळा हे एकक असल्याने असाक्षरांचे सर्वेक्षण, उल्लास ॲपवर नोंदणी, स्वयंसेवकांबरोबर जोडणी, त्यांच्याद्वारे अध्यापन व परीक्षा या बाबी अपेक्षित आहेत.
----------------------------
" लिहिता,वाचता येणे व संख्याज्ञान एवढीच साक्षरतेची मर्यादित व्याख्या नसून नवसाक्षरांना जीवन कौशल्ये आत्मसात होणे अपेक्षित आहे. या योजनेकडे सर्वांना वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजनेचा प्रचार करावा लागणार आहे."
-राजेश क्षीरसागर, राज्य योजना शिक्षण उपसंचालक, पुणे