MPSC औषध निरीक्षक परीक्षा: पेपरफुटीच्या आरोपांवरून खळबळ

आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने तक्रारदाराचा जबाब नोंदवून पुरावे ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आयोगाकडे वर्ग केले आहे.

MPSC औषध निरीक्षक परीक्षा: पेपरफुटीच्या आरोपांवरून खळबळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'औषध निरीक्षक' (Drug Inspector - जाहिरात क्र. ११६/२०२५) या पदाच्या भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार आणि पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावर आमदार रोहित पवार यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली आहे. 

व्हॉट्सॲपवर ९० प्रश्न आधीच व्हायरल आल्याचा दावा गौरव पाटील या परीक्षार्थीने याप्रकरणी ईमेलद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. परीक्षेतील १०० पैकी तब्बल ९० प्रश्न दोन दिवस आधीच, म्हणजेच २० मार्च रोजी व्हॉट्सॲपवर फिरत असल्याचा खळबळजनक आरोप त्याने केला आहे. तसेच, ऋषी पाटील (इंस्टाग्राम आयडी: rushi_patil_1919) नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप केला आहे.

आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने तक्रारदाराचा जबाब नोंदवून पुरावे ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आयोगाकडे वर्ग केले आहे.

दरम्यान, MPSC कडून आरोप फेटाळले असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC तील अधिकाऱ्यांनी सांगितले की , "औषध निरीक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिन्याभरापूर्वीच पूर्ण झाली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. निकालानंतर चुकीची माहिती पसरवून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही." तसेच, तक्रारीत काही तथ्य आढळल्यास त्याची निष्पक्ष चौकशी केली जाईल; परंतु आरोप खोटे सिद्ध झाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर आणि उमेदवारांमध्ये अविश्वास पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड इशाराही एमपीएससीने दिला आहे.