विद्यापीठातच प्राण सोडले: साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का, २६ वर्षीय पीएचडी विद्यार्थिचा मृत्यू

पंजाब विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसमध्ये एका दुर्दैवी घटनेत २६ वर्षीय पीएचडी संशोधक विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालत असताना तिला विजेचा धक्का बसल्याचे प्राथमिक माहिती आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव ज्योती यादव असे असून, ती हरियाणा राज्याची रहिवासी होती.

विद्यापीठातच प्राण सोडले: साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का, २६ वर्षीय पीएचडी विद्यार्थिचा मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पंजाब विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसमध्ये एका दुर्दैवी घटनेत २६ वर्षीय पीएचडी संशोधक विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू (Student dies due to electric shock) झाला. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालत असताना तिला विजेचा धक्का बसल्याचे प्राथमिक माहिती आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव ज्योती यादव (The name of the deceased student is Jyoti Yadav.)असे असून, ती हरियाणा राज्याची रहिवासी होती. मायक्रोबायोलॉजी विभागात पीएचडीचे संशोधन करणाऱ्या ज्योतीचा मृत्यू विद्यापीठ परिसरातच झाल्याने संपूर्ण कॅम्पसात खळबळ उडाली आहे.

घटनेनुसार, ज्योती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विजेच्या खांबाजवळ पडलेली आढळली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी या दृश्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर पाणी साचले होते आणि त्यातून चालताना खांबाजवळील विजेच्या गळतीमुळे किंवा तांत्रिक दोषामुळे तिला धक्का बसला असावा, असे अनुमान व्यक्त केले जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर अधिक तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घालत विद्यापीठ प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, कॅम्पसमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या विजेशी संबंधित घटना घडल्या आहेत, तरीही प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावरील पाण्याचे निचरा, विजेच्या खांबांची नियमित देखभाल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय यंत्रणा नसल्याचे त्यांचे मुख्य म्हणणे आहे.

विद्यापीठ प्रशासनाने मात्र घटनेची गंभीर दखल घेतली असून, याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. या प्रकारामुळे शैक्षणिक परिसरातील मूलभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. ज्योती यादवसारख्या होतकरू विद्यार्थिनीचा असा अकाली मृत्यू हा केवळ एक वैयक्तिक दुर्दैव नसून, संस्थात्मक निष्काळजीपणाचा परिणाम असल्याची भावना विद्यार्थी वर्गात दिसून येत आहे.