उच्चशिक्षित बेरोजगारांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन; उच्च शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

उच्च शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर संघर्ष समिती कडून 'तुमची दिवाळी आमचं दिवाळं' या हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

उच्चशिक्षित बेरोजगारांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन; उच्च शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नेट (NET), सेट (SET), पीएच.डी धारक संघर्ष समितीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या (Higher Education Department) कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा (दि. २२) तिसरा दिवस आहे. प्राध्यापकांची शंभर टक्के भरती (Professor Recruitment), तासिका तत्व धोरण बंद करणे, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची (Assistant Professor) नियुक्ती आदी समितीच्या प्रमुख मागण्या आहेत. उच्च शिक्षण विभागाकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.

 

उच्च शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर संघर्ष समिती कडून 'तुमची दिवाळी आमचं दिवाळं' या हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्यपाल यांनी लक्ष घालून  प्रश्न सोडवावा यासाठी संघर्ष समिती दि. २० ते २४ नोव्हेंबर  या कालावधीत पुणे ते मुंबई अशी संघर्ष पदयात्रा काढून उच्च शिक्षितांच्या लालफितशाहीमुळे कुचकामी ठरलेल्या पदव्या राज्यपाल यांना विद्यापीठाचे कुलपती म्हणून साभार परत करण्यात येणार होत्या, अशी माहिती राज्य समन्वयक डॉ. प्रमोद तांबे यांनी दिली.

सिम्बायोसिस विद्यापीठात महारोजगार मेळाव्याचे आयोजन; तीन हजारांहून अधिक पदभरती

 

संघर्ष समितीच्या १५ समन्वयकांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस बजावून मज्जाव करण्यात आला. त्यानंतर संघर्ष समितीने बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आपला पवित्रा जाहीर करत आंदोलन पुढे सुरू ठेवल्याचे तांबे यांनी सांगितले. आज आंदोलनाचा पाचवा व उपोषणाचा तिसरा दिवस असून शासन या प्रश्नासंदर्भात गंभीर दिसून येत नाही, असा दावा तांबे यांनी केला. अन्नत्याग केलेले प्रा.विकास गवई, डॉ. देवानंद गोरडवार व डॉ. भारत राठोड यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मत व्यक्त केले.

 

या आहेत प्रमुख मागण्या

- केंद्र शासन व UGC च्या निर्देशानुसार १०० टक्के प्राध्यापक भरती करणे.

- केंद्र शासन व UGC च्या निर्देशानुसार तासिका तत्त्व (CHB) धोरण बंद करुन 'समान काम समान वेतन' लागू करणे.

- सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करणे.

- विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करणे.

- दि. १७ ऑक्टोबर २०२२ व दि. २७ मार्च २०२३ च्या तासिका तत्व धोरण शासन निर्णयांचे तंतोतंत पालन करणे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO