पदवी हवी असेल तर नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा द्या, विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना फर्मान
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी नुकतीच ५ व्या व ६ व्या सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन शेवटच्या सेमिस्टरला त्यांनी नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा दिली होती. मात्र, या विद्यार्थ्यांचे १ ते ४ सेमिस्टरची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमांनुसार झाली होती. शेवटचे सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीची गुणपत्रिका मिळणे क्रमप्राप्त होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) भोंगळ कारभाराचा फटका बीबीए, बी.कॉम.ची पदवी (BBA, B.Com degree) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या विद्यार्थ्यांनी शेवटच्या दोन सेमिस्टरची परीक्षा नव्या अभ्यासक्रमाने दिली, मात्र पहिले चार सेमिस्टरची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाने दिल्याने त्यांची पदवी देण्यास विद्यापीठाने नकार (University refuses to award degree) दिला आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या विषयांची परीक्षा पुन्हा द्या, तरच पदवी मिळेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी नुकतीच ५ व्या व ६ व्या सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन शेवटच्या सेमिस्टरला त्यांनी नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा दिली होती. मात्र, या विद्यार्थ्यांचे १ ते ४ सेमिस्टरची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमांनुसार झाली होती. शेवटचे सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीची गुणपत्रिका मिळणे क्रमप्राप्त होते.
मात्र, या विद्यार्थ्यांचा निकाल विथल्डमध्ये टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी विचारणा करायला गेले असता, विद्यापीठाने १ ते ४ सेमिस्टरमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन कोर्सच्या विषयांची पुन्हा परीक्षा देण्याचे व त्यानंतरच पदवीची गुणपत्रिका मिळेल, असे आदेश विद्यापीठाने काढले आहेत. त्यामुळे बीबीए, बी. कॉमचे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
विशेष म्हणजे पदवी पूर्ण केल्याची गुणपत्रिकाच मिळणार नाही, तर त्यांना एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे उत्तीर्ण झाल्यानंतरही हे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाकडून अशाप्रकारे वेळेवर परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.