MPSC कडून २६१९ पदांसाठी जाहिरात आली, विद्यार्थी आक्रमक झाले, काय आहे मागणी ?
अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जून ते १७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सुरू राहणार असून, शुल्क भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गासाठी इच्छुक उमेदवारांना विशेष विकल्प देणे बंधनकारक आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ (Combined Pre-Examination)साठी २६१९ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध (Advertisement Published) केली आहे. विविध विभागांतर्गत या पदांसाठी २७ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाइन संगणक आधारित परीक्षा (CBT) घेण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष (Huge anger among students) निर्माण झाला असून, ते आक्रमक झाले आहेत.
आयोगाने जाहिरातीत स्पष्ट केले आहे की, पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत नवीन मागण्या, आरक्षण बदल किंवा पद संख्या वाढीची शक्यता लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जून ते १७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सुरू राहणार असून, शुल्क भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक संवर्गासाठी इच्छुक उमेदवारांना विशेष विकल्प देणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
ऑनलाइन परीक्षा पद्धत तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घ्यावी. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन परीक्षेमुळे दूरच्या केंद्रांवर जाणे, प्रवास-निवासाचा खर्च, तांत्रिक अडचणी, नॉर्मलायझेशन प्रक्रिया आणि गैरव्यवहाराची भीती निर्माण होते. पेपरफुटी, तांत्रिक फेरफार आणि भ्रष्टाचाराची शक्यता वाढल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२३ मध्ये गट-क च्या मोठ्या भरतीसाठी यशस्वीपणे ऑफलाइन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आग्रह आहे की, शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आगामी सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात. याबाबत चालू विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी केली जात आहे.
आयोगाने मात्र जाहिरातीत सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. सध्या विद्यार्थी संघटनांनी या मुद्द्यावर आंदोलनाची तयारी सुरू केली असून, शासन आणि आयोगाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
_________________________________________
महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर विश्वास आहे, परंतू परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांवर विश्वास नाही. या आधीच्या घटना पाहता कंपन्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. म्हणून परीक्षा ह्या ऑलाईन पद्धतीने झाल्या पाहिजेत.
महेश घरबुडे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन