AI तंत्रज्ञानावर स्वार होऊन ताबा मिळवा; सिंबायोसिसच्या 'साई' इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
'एआय' या तंत्रज्ञानावर घोड्याप्रमाणे स्वार होऊन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा; तेव्हाच आपल्याला त्याचा वेग आणि क्षमता ओळखता येतील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) (Artificial Intelligence -AI)सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत असून सध्या डिजिटल फ्रॉडमध्ये (Digital Fraud)त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.मात्र, प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाला दोन बाजू असतात.त्यामुळे या तंत्रज्ञानाला घाबरून न जाता 'एआय' या तंत्रज्ञानावर घोड्याप्रमाणे स्वार होऊन त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा; तेव्हाच आपल्याला त्याचा वेग आणि क्षमता ओळखता येतील, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे सुरू करण्यात आलेल्या ' सिंबायोसिस आर्टिफिशल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट' (साई) (Symbiosis Artificial Intelligence Institute -SAII)च्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार, सिंबायोसिस विद्यापीठाच्या प्रो.चान्सलर डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, संचालक लवलीन गौर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, एआय तंत्रज्ञानामुळे जगात मोठी क्रांती घडत आहे. किती लोकांच्या नोकऱ्या जातील आणि किती नोकऱ्या टिकतील,यावर सध्या चर्चा होत आहे.मात्र एआय मुळे निर्माण झालेल्या सुनामीला उत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे. कारण यापूर्वी भारताने प्रत्येक आव्हानाला तोंड दिले आहे. सध्या एआय चा वापर करून बनावट आवाज आणि फोटो सहज तयार केला जात आहे. त्यातून फसवणूकीच्या घटना घडत आहेत.परंतु, एआय मुळे केवळ वाईट गोष्टीच घडत आहेत, असे नाही तर नवीन औषध निर्मितीमध्ये एआयचा चांगला उपयोग होत आहे.
प्रत्येकाने नव्या बदलाला सामोरे गेले पाहिजे,असे नमूद करून फडणवीस म्हणाले, सिंबायोसिस आर्टिफिशल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट' ला पुढे निश्चितच मैलाचा दगड म्हणून पहिले जाईल.या इन्स्टिट्यूट मधून एआय विषयक मनुष्यबळ तयार होईल. त्यामुळे या संस्थेच्या स्थापनेची निश्चितच ही योग्य वेळ आहे. तसेच राज्य शासनातर्फे सर्व सामान्य नागरिकांना एआयबाबत बेसिक मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे.तसेच शेतकऱ्यांसाठी एआयच्या मदतीने योग्य मार्गदर्शन करण्यावर काम सुरू आहे.पुण्यातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी गुगल बरोबर करार करून कोणत्या मार्गाने वाहतूक कोंडीत अडकणार नाही, यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे,
डॉ. शां.ब.मुजुमदार म्हणाले, सिंबायोसिस आर्टिफिशल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट' अर्थात साई हे भारतातील पहिले एआय इन्स्टिट्यूट आहे. यातून केवळ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर बीबीए, बीएस्सी सह इतर विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना सुध्दा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली तेव्हा एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
डॉ.विद्या येरवडेकर म्हणाल्या, एआय क्षेत्रातील वाढत्या संधीचा विचार करता सिंबायोसिसने सिंबायोसिस आर्टिफिशल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट' (साई) स्थापना करण्याचा निर्णय घेतला.लवकरच नागपूर येथील कॅम्पसमध्ये सुध्दा आर्टिफिशल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट' सुरू केली जाईल.