मुंबई विद्यापीठ : प्रवेश प्रक्रियेत त्रुटी आढळल्यास महाविद्यालयांना लाखो रुपयांचा दंड

मुंबई विद्यापीठाच्या दंडात्मक परिपत्रकाला शिव विधी व न्याय सेनेचा विरोध; मागणी परिपत्रक मागे घ्यामुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांवर प्रवेश प्रक्रियेत त्रुटी आढळल्यास लाखो रुपयांचा दंड आणि इतर कठोर कारवाई करण्याच्या परिपत्रकाला शिवसेनेच्या शिव विधी व न्याय सेना संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे.

मुंबई विद्यापीठ : प्रवेश प्रक्रियेत त्रुटी आढळल्यास महाविद्यालयांना लाखो रुपयांचा दंड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाशी (Mumbai University) संलग्न महाविद्यालयांवर प्रवेश प्रक्रियेत त्रुटी (Discrepancies in the admission process) आढळल्यास लाखो रुपयांचा दंड आणि इतर कठोर कारवाई करण्याच्या परिपत्रकाला शिवसेनेच्या शिव विधी व न्याय सेना संघटनेने तीव्र विरोध (Strong opposition from organizations) दर्शवला आहे. विद्यापीठाने नुकतेच जारी केलेल्या या परिपत्रकामुळे महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांवरही मोठा आर्थिक भुर्दंड पडणार असल्याने मत व्यक्त करत काही संघटनांनी तातडीने हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी (Demand to withdraw the circular) केली आहे. 

विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार, प्रथम वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधित महाविद्यालयांना २ लाख, ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नियमित प्रवेश अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम दुप्पट वसूल करणे आणि महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता कमी करण्यासारख्या कठोर पावलांचा समावेश आहे. या निर्णयामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष ऍड. नितीश सोनवणे यांनी विद्यापीठाच्या या परिपत्रकाला आक्षेप नोंदवत निवेदनाद्वारे विरोध व्यक्त केला. परिपत्रकातील सूचना अस्पष्ट, अवाजवी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सकारात्मक निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या हितरक्षणासाठी तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

या परिपत्रकामुळे महाविद्यालयांना आर्थिक दंड, प्रवेश क्षमतेची कपात, चौकशी समिती आणि भविष्यातील निर्बंध यासारख्या अडचणींना सामोरे जावे वागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत छोट्या चुका किंवा तांत्रिक अडचणींसाठी एवढा मोठा दंड आणि शिक्षेची तरतूद अवाजवी असल्याचे मत काही संघटनांनी व्यक्त केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कावर परिणाम होऊ नये, यासाठी तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिव विधी व न्याय सेना संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाला विद्यार्थीविरोधी ठरवत न्याय्य आणि समंजस भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना हा वाद समोर आला असून, विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.