अण्णाभाऊ साठे जयंती 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरी होणार

'लेखन प्रेरणा दिन' निमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी कविता, कथा आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

अण्णाभाऊ साठे जयंती 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरी होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मराठी साहित्य विश्वाला आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी १ ऑगस्ट हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये "लेखन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि वैचारिक वारशातून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक-युवतींमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, नवोदित लेखक घडावेत तसेच समाजातील सर्व स्तरांतील प्रतिभावंतांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळावे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

'लेखन प्रेरणा दिन' निमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी कविता, कथा आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा, स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती व व्याख्याने, ग्रंथदिंडी, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे उपक्रम, तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, लोकनाट्ये आणि शाहिरी साहित्याचे सामूहिक वाचन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्व, साहित्यिक कर्तृत्व आणि सामाजिक योगदानावर विशेष व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा आणि साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याच्याही सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समृद्ध साहित्यिक व वैचारिक वारशाचा व्यापक प्रचार-प्रसार होण्याबरोबरच नवीन पिढीमध्ये लेखन, वाचन आणि सर्जनशील विचारांची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.