11th Admission:अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल; तिसऱ्या फेरीचे प्रवेश 'या' तारखेपर्यंतच
विद्यार्थ्यांना आता येत्या 25 व 26 जुलै रोजीच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
11th Admission:राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या प्रवेशाची तिसरी फेरी सुरू झाली असून या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी 4 लाख 10 हजार 498 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. तर 82 हजार 952 विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केला आहे. या विद्यार्थ्यांना आता येत्या 25 व 26 जुलै रोजीच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी 22 ते 23 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरण्यासाठी व पसंतीक्रम नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. तसेच या विद्यार्थ्यांना 26 ते 28 जुलै या कालावधीपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना आता 25 ते 26 जुलै या कालावधीमध्येच आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या दोन प्रवेश फेऱ्यांमधून केवळ 7 लाख 20 हजार 666 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीसाठी 13 हजार 621 नव्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीतून किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आणखी किती दिवस विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.