प्राध्यापक भरतीसाठी शिफारस केल्यास याद राखा; मुख्यमंत्र्यांची ताकीद
"उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनिष्ठ असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदभरती तसेच सार्वजनिक विद्यापीठातील शिक्षकीय पदभरती संदर्भात कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाने कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा शिफारस करू नये", असे या फलकावर स्पष्ट करण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात प्राध्यापक पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु,या भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. मात्र भरतीबाबत शिफारस करण्यास खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीच बंदी घातली आहे. एवढेच नाही तर मंत्रालयात या संदर्भातील फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजातील प्राध्यापक भरती पारदर्शक पद्धतीने होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू झाली असून महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेसाठी रोस्टर तपासणीसह इतर आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्यात सुमारे पाच हजाराहून अधिक प्राध्यापकांची पदे भरली जाणार आहेत. परंतु, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालना समोर भला मोठा फलक लावण्यात आला आहे.
"उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनिष्ठ असलेल्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदभरती तसेच सार्वजनिक विद्यापीठातील शिक्षकीय पदभरती संदर्भात कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाने कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा शिफारस करू नये", असे या फलकावर स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राध्यापक भरती संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, संचालक यांच्यासह कोणालाही प्राध्यापक भरतीबाबत शिफारस करता येणार नाही. काही लोकप्रतिनिधी यांच्याकडून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भरतीबाबत शिफारस केली जात होती. मात्र, प्राध्यापक भरतीमध्ये कोणतीही गडबड होता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे बोलले जात आहे.त्यानंतर हा फलक लावण्यात आला आहे, असे वृत्त एका नामांकित दैनिकाने सुध्दा प्रसिध्द केले आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेतील प्राध्यापक भरती मध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. त्यावर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. त्यातच प्राध्यापक भरतीसाठी संस्था चालकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचा आरोप केला जातो. मात्र, या पुढील काळात भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक पावले उचलले जातील, अशी आशा निर्माण झाली आहे.