नागपूर वसतीगृहातील असुरक्षित विद्यार्थिनीबाबत काय घडलं; मंत्री बावनकुळेंचा विद्यार्थीनीला फोन

पालकमंत्र्यांनी वसतिगृह वार्डन व संबंधित अधिकाऱ्यांना समज दिली. विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून काढण्याबाबत काढलेली नोटीस तत्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले. तसेच वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही दिले.

नागपूर वसतीगृहातील असुरक्षित विद्यार्थिनीबाबत काय घडलं; मंत्री बावनकुळेंचा विद्यार्थीनीला फोन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नागपूर शासकीय ओबीसी मुलींच्या वसतिगृहात (OBC Girls' Hostel) मध्यरात्री दोन अज्ञात तरुणांनी घुसखोरी करून एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन (Misconduct towards female students) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना, तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढण्याची नोटीस (Notice to students) देण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी थेट हस्तक्षेप करत पीडित विद्यार्थिनीला फोन करून धीर दिला आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील शासकीय ओबीसी मुलींच्या वसतिगृहात घडली ही घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात तरुण वसतिगृहाच्या परिसरात घुसले. एका विद्यार्थिनीच्या खोलीजवळ जाऊन त्यांनी गैरवर्तनाचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने तात्काळ आरडाओरडा केल्याने इतर विद्यार्थिनी जाग्या झाल्या आणि आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे संपूर्ण वसतिगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनींनी वसतिगृह व्यवस्थापनाकडे सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली. सीसीटीव्ही कॅमेरे, रात्रंदिवस गस्त आणि मुख्य दरवाज्यावर योग्य सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आली. मात्र याऐवजी काही अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर पडा, अशी अप्रत्यक्ष नोटीस वजा धमकी दिल्याचा आरोप करण्यात आले आहे. या नोटीस प्रकरणाने विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.

या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पीडित विद्यार्थिनीला थेट फोन करून घटनेची माहिती घेतली आणि पूर्ण सुरक्षा, न्याय व प्रशासनाकडून सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. मुलींच्या सुरक्षेला कोणतीही तडजोड होणार नाही. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे बावनकुळे म्हणाले.

पालकमंत्र्यांनी वसतिगृह वार्डन व संबंधित अधिकाऱ्यांना समज दिली. विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून काढण्याबाबत काढलेली नोटीस तत्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले. तसेच वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही दिले. सीसीटीव्ही कॅमेरे, दिवसरात्र सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थिनींसाठी हेल्पलाइन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये मुलींची सुरक्षा किती दुर्लक्षित आहे, याचे हे उदाहरण आहे. सीसीटीव्ही आणि मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थिनींना धोका निर्माण होत आहे, अशी टीका विरोधकांनी केली. पालकमंत्री बावनकुळेंच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थिनींना दिलासा मिळाला असला तरी, या प्रकाराने शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच अटक होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.