गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने कानशिलात लगावली; सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

सीसीटीव्ही फुटेजनुसार मुलगा रडत रडत विनवणी करत असतानाही शिक्षिकेने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतरच्याच क्षणी मुलगा अचानक कोसळला आणि नंतर रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. पालकांनी शिक्षिकेच्या असंवेदनशील वागणुकीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने कानशिलात लगावली; सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका खासगी शाळेत झालेली धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. सहा वर्षांच्या विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे शिक्षिकेने त्याला कठोर शिक्षा दिली. सीसीटीव्ही फुटेजनुसार मुलगा रडत रडत विनवणी करत असतानाही शिक्षिकेने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतरच्याच क्षणी मुलगा अचानक कोसळला आणि नंतर रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. पालकांनी शिक्षिकेच्या असंवेदनशील वागणुकीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सदर घटनेवेळी शिक्षिका विद्यार्थ्यांचा गृहपाठ तपासत होती. मृत मुलाचा अपूर्ण गृहपाठ पाहून ती रागाने भडकली. मनात भीती भरलेला मुलगा हात जोडून “मारू नका” अशी विनंती करत होता. तरीही शिक्षिकेने त्याचा शर्ट पकडून खेचला, गणवेश व्यवस्थित करताना गालावर चापट मारली आणि कानशिलात जोरात लगावली. काही सेकंदांतच मुलगा तिच्या अंगावर कोसळला. शिक्षिकेने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा कोणताही प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत जाहीर करण्यात आले.

मुलाच्या पालकांनी सांगितले की, शाळेने त्यांना ताबडतोब फोन करून माहिती दिली नाही. एका नातेवाईकाने ही दुःखद बातमी कळवल्यानंतरच त्यांना समजली. पालकांनी मुलाची प्रकृती बिघडलेली होती, ही शक्यता फेटाळून लावली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ ताब्यात घेतला असून संबंधित गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप उपलब्ध नसल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आंध्र प्रदेशचे मनुष्यबळ विकास मंत्री नारा लोकेश यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, शिक्षिकेच्या मारहाणीमुळे सहा वर्षांच्या मुलाचा जीव गेल्याचे पाहून हृदय पिळवटून निघाले. सरकार दोषी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करत आहे. त्यांनी पालकांप्रति मनःपूर्वक संवेदना व्यक्त करत सरकार सर्वतोपरी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन दिले.

ही घटना शाळांमध्ये शिस्त राखण्याच्या नावाखाली होणाऱ्या अमानवी वागणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करते. पालक आणि समाज शिक्षकांच्या असंवेदनशील वृत्तीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहेत. पोलिसांचा तपास सुरू असताना मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि अशा घटनांना भविष्यात आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.