शारीरिक शिक्षण, कला व कार्यशिक्षणाची पुस्तके तिसरी, चौथी व सहावीसाठी अनिवार्य; शिक्षण विभागाचा निर्णय
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. या बदलांच्या पार्श्वभूमीवर इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांची नव्याने प्रकाशित पाठ्यपुस्तके आता अनिवार्यपणे वापरावी लागणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. या बदलांच्या पार्श्वभूमीवर इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांची नव्याने प्रकाशित पाठ्यपुस्तके आता अनिवार्यपणे वापरावी लागणार आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये या पुस्तकांचा वापर करण्याच्या सूचना शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यापैकी तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण आणि कलाशिक्षण या विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत. सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण आणि कलाशिक्षण या विषयांची पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके बालभारतीच्या विभागीय भांडारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली माध्यमांसाठी संबंधित पाठ्यपुस्तके ‘ई-बालभारती’च्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांनी या अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांचा नियमित वापर करावा, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. केवळ पुस्तक उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर नियोजित वेळापत्रकानुसार अध्यापन करणेही अपेक्षित आहे.
शारीरिक शिक्षण व निरामयता, कार्यशिक्षण, कलाशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांसाठी आठवडानिहाय तासिका आणि वेळापत्रक यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांनी या विषयांचे अध्यापन नियोजित वेळापत्रकानुसार करणे आवश्यक आहे. राज्यातील राज्य मंडळाशी संबंधित शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांमधील इयत्ता तिसरी, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या सूचनांची अंमलबजावणी होणार आहे.
सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये आवश्यक कार्यवाही करून या पाठ्यपुस्तकांचा वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून शारीरिक, कलात्मक आणि व्यावसायिक कौशल्यांना अधिक महत्त्व दिले जात आहे. या बदलांमुळे शालेय शिक्षण अधिक व्यावहारिक आणि जीवनाभिमुख बनेल, अशी अपेक्षा आहे.