शिक्षकेतर भरतीचे अधिकार संस्थांना; दोन महिन्यांत ३० हजार शिक्षकांची भरती; शिक्षणमंत्र्यांची अधिकृत माहिती
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सुधारणा आणि शिक्षक भरतीची घोषणा केली आहे. 'पवित्र' पोर्टलद्वारे राबविल्या जाणाऱ्या या भरती मोहिमेमुळे राज्यभरातील शिक्षकांच्या हजारो रिक्त जागा भरल्या जाण्याची अपेक्षा आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यालयात मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस शासनाने मंजुरी दिली असून ही प्रक्रिया संबंधित शिक्षण संस्थांनाच पार पाडावी लागेल. तसेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येत्या दोन महिन्यांत राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती पूर्ण करण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती मंञी भुसे यांनी दिली. या भरतीत कला व क्रीडा शिक्षकांना, माजी सैनिकांना आणि खेळाडूंना प्राधान्य दिले जाईल, असे देखील ते म्हणाले.
भुसे यांनी मविप्र संस्थेच्या कार्याचा गौरव केला. प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला संस्थेचा प्रवास आज महाकाय वटवृक्षाप्रमाणे विस्तारला असल्याचे त्यांनी नमूद केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेचेही कौतुक करताना त्यांनी शिक्षक केशव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरीतील विद्यार्थी एका हाताने मराठी तर दुसऱ्या हाताने इंग्रजी लिहित असल्याचे आणि १२०० ते १५०० पर्यंतचे पाढे तोंडपाठ असल्याचे उदाहरण दिले. अशा प्रकारचे प्रयत्न शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास मदत करतात, असे त्यांचे मत होते.

चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईसह सर्व अभ्यासक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास दोन पानांत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ७० हून अधिक स्थानिक महापुरुषांचा इतिहासही अभ्यासक्रमात आणला जाईल. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे आणि राष्ट्रगीतानंतर ‘गर्झा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोल्हापूर पॅटर्नसह विविध शैक्षणिक उपक्रमही राज्यात राबविले जातील. शिक्षण हिताच्या दृष्टीने विभागाकडे एसएमएसद्वारे येणाऱ्या सकारात्मक सूचनांचाही गांभीर्याने विचार केला जाईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आणि क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यासाठी शासन तसेच सीएसआर निधीतून सहकार्य केले जाईल. पालकांनी मुलांचा मोबाइल वापर कमी करूनदररोज किमान अर्धा ते एक तास त्यांच्याशी संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. या घोषणांमुळे शिक्षण क्षेत्रात गुणात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संस्थांना भरतीचे अधिकार मिळाल्याने प्रक्रिया गतिमान होईल आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची मोठी कमतरता भरून काढता येईल, असे शैक्षणिक वर्तुळातून मत व्यक्त होत आहे.