खासगी विद्यापीठ दर्जानंतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी केवळ ४० टक्के जागा; नीट-यूजी विद्यार्थी संभ्रमात

महाराष्ट्रातील वैद्यकीय जागांबाबत 'नीट यूजी' विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, कारण तीन खाजगी विद्यापीठांनी राज्याचे अधिवास (डोमिसाईल) असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ४०% जागा राखीव ठेवल्या आहेत.

खासगी विद्यापीठ दर्जानंतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी केवळ ४० टक्के जागा; नीट-यूजी विद्यार्थी संभ्रमात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात नव्याने खासगी विद्यापीठाचा दर्जा मिळालेल्या तीन वैद्यकीय व दंत महाविद्यालयांमधील प्रवेशाच्या जागांबाबत नीट-यूजीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केलेल्या जागा मॅट्रिक्समध्ये या संस्थांतील केवळ ४० टक्के जागा महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत, तर उर्वरित ६० टक्के जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी या महाविद्यालयांतील सर्व जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत्या. त्यामुळे महाविद्यालय निवडीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांना या नव्या तरतुदीचा थेट फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर, एन.के.पी. साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रणजीत देशमुख डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, नागपूर या तीन संस्थांना सोमवारी राज्य मंत्रिमंडळाने खासगी विद्यापीठाचा दर्जा देण्यास मंजुरी दिली. मात्र, या महाविद्यालयांची नावे सध्याच्या जागा मॅट्रिक्समध्ये समाविष्ट नसल्याने विद्यार्थ्यांचा संभ्रम आणखी वाढला आहे. अनेक पालक आणि विद्यार्थी सीईटी सेलकडे चौकशी करत आहेत, कारण त्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात जागा मिळण्याची शक्यता अचानक कमी झाल्यासारखी वाटत आहे.

याबाबत सीईटी सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, संबंधित संस्थांना खासगी विद्यापीठाचा दर्जा देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवेश फेरीत या महाविद्यालयांच्या जागा मॅट्रिक्समध्ये समाविष्ट केल्या जातील. खासगी विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतरही प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फतच राबविली जाईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अधिकृत जाहीरातींची वाट पहावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

दरम्यान, खासगी विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर शुल्कवाढ होण्याची शक्यताही विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आहे. शुल्कावरील सरकारी नियंत्रण कमी झाल्यास पालकांवरील आर्थिक भार वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. अनेक पालक म्हणतात की, वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आधीच जास्त असताना शुल्कवाढ झाल्यास मध्यमवर्गीय कुटुंबांना अडचण निर्माण होईल. त्यामुळे सरकारने शुल्क नियंत्रण कायम ठेवावे, अशी मागणीही होऊ लागली आहे. सध्या विद्यार्थी आणि पालक पुढील अधिकृत मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत.

__________________________________

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध जागा कमी होण्याची शक्यता आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४०० एमबीबीएस, तर दंत महाविद्यालयात १०० बीडीएस जागा असल्याचे सांगितले. मात्र, ४० टक्क्यांमुळे महाराष्ट्र कोट्यातील सुमारे २३५ जागा कमी होऊन याचा स्थानिक विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

कल्पेश यादव, युवासेना,  सहसचिव