‘शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षण आवश्यक’ : मंत्री चंद्रकांत पाटील
या पुरस्कारांसाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या शिफारशीचा किंवा चिठ्ठीचा विचार करण्यात आलेला नाही. अत्यंत कठोर आणि पारदर्शक छाननी प्रक्रियेतून केवळ गुणवत्तेच्या आधारे राज्यातील ४२ प्राध्यापक व शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. तसेच महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि तर्कावर आधारित विज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणासोबतच जीवनमूल्यांचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने १४ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू करण्यात आलेल्या 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार आणि डॉ. सागर देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार निवडीबाबत बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, या पुरस्कारांसाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या शिफारशीचा किंवा चिठ्ठीचा विचार करण्यात आलेला नाही. अत्यंत कठोर आणि पारदर्शक छाननी प्रक्रियेतून केवळ गुणवत्तेच्या आधारे राज्यातील ४२ प्राध्यापक व शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

शैक्षणिक व्यवस्थेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान असल्याने पुढील वर्षापासून 'आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार' सुरू करण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. याशिवाय शिक्षण व समाजात नवीन प्रयोग करणाऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने 'उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार' देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकल माता कुटुंबांतील मुलींना उच्च शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मदतीची गरज असल्याचे सांगत, शासनाच्या एकल पालक योजनेविषयीही त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी २०१२ पासून बंद पडलेली पुरस्कार परंपरा तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व अंजली जोशी यांनी मनोगत व्यक्त करत या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.