धक्कादायक : प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनी घरी कोचिंग घेऊन विद्यार्थ्यांना दिले NEET परीक्षेचे प्रश्न
आरोपी मनीषा मांढरे यांनी पुण्यातील आणखी एक आरोपी मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून NEET परीक्षार्थींना संपर्क साधला. मनीषा वाघमारे हिला यापूर्वी 14 मे 2026 रोजी अटक करण्यात आली होती.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नीट पेपर फूटी प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या तपासात मांढरे यांच्या निवासस्थानी विशेष कोचिंग क्लासेस आयोजित करण्यात आले होते. या वर्गांमध्ये बॉटनी आणि झूलॉजी विषयातील अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, त्यांची चर्चा करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना ते प्रश्न वहीत लिहून ठेवण्यास आणि पुस्तकांमध्ये मार्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यामुळे सीबीआयने मांढरे यांना ताब्यात घेतले आहे.
NEET-UG 2026 परीक्षेतील जीवशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एका मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आल्याचे समोर आले. या सूत्रधार म्हणजे पुण्यातील वरिष्ठ वनस्पतिशास्त्र (Botany) विषयाच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना दिल्लीमध्ये चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, मनीषा मांढरे या NEET-UG 2026 परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होत्या. त्यांची राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना बॉटनी आणि झूलॉजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांबाबत माहिती होती,असा आरोप आहे.
तपासात उघड झाले की, एप्रिल 2026 दरम्यान आरोपी मनीषा मांढरे यांनी पुण्यातील आणखी एक आरोपी मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून NEET परीक्षार्थींना संपर्क साधला. मनीषा वाघमारे हिला यापूर्वी 14 मे 2026 रोजी अटक करण्यात आली होती.विशेष म्हणजे, या वर्गांमध्ये शिकवण्यात आलेल्या प्रश्नांपैकी मोठ्या प्रमाणातील प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या प्रत्यक्ष NEET-UG 2026 प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत सीबीआयने देशभरातील सहा ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांचे सविस्तर विश्लेषण सुरू आहे. हे प्रकरण 12 मे 2026 रोजी शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीनंतर सीबीआयने नोंदवले होते.
आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना पुणे न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात आले असून त्यांना दिल्ली न्यायालयात सादर करण्यात येणार आहे,अशी माहिती पीआयबीतर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.