उल्लास नव भारत साक्षरता योजनेची  परीक्षा पुढे ढकलली; FLNAT शिक्षण विभागाकडून सर्व जिल्ह्यांना आदेश

उल्लास न्यू इंडिया लिटरेसी प्रोग्राम अंतर्गत FLNAT 2026 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीनतम माहिती, परीक्षेचा नमुना आणि सुधारित तारखेचा तपशील तपासा.

उल्लास नव भारत साक्षरता योजनेची  परीक्षा पुढे ढकलली; FLNAT शिक्षण विभागाकडून सर्व जिल्ह्यांना आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकारच्या उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन होते. मात्र काही अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा स्थगित करण्यात आली. शिक्षण संचालक तथा सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी (योजना) व मुंबईच्या शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे याबाबत सूचना दिल्या आहेत. सुधारित तारीख व वेळ अद्याप जाहीर झालेली नाही.

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र निश्चिती, परीक्षार्थींची नोंदणी व यादी तयार करणे, भौतिक व प्रशासकीय व्यवस्था तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याची पूर्वतयारी सुरू होती. परीक्षा पुढे ढकलल्याने ही सर्व पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्रांशी संबंधित अधिकारी-कर्मचारी आणि इतर घटकांना परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती ताबडतोब देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. संबंधित सर्वांनी याबाबत जागरूक राहावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर नागरिकांसाठी ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आयोजित केली जाते. निरक्षरतेचे प्रमाण कमी करून मूलभूत साक्षरतेचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. परीक्षा एकूण १५० गुणांची असून वाचन, लेखन आणि संख्याज्ञान (गणित) या तीन विषयांचा समावेश असतो.

या उपक्रमाद्वारे केवळ अक्षर ओळखच नव्हे, तर डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहारज्ञान, कायदेविषयक माहिती, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञानही दिले जाते. परीक्षा पुढे ढकलल्याने संबंधित सर्वांनी अधिकृत सूचनांची वाट पहावी. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुन्हा पूर्वतयारी सुरू होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते.