BLO च्या कामामुळे पुण्यातील अनेक शाळा होणार बंद? संस्थाचालक हतबल; विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? 

पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील तब्बल 59 कर्मचाऱ्यांना बीएलओच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. येत्या 29 जुलैपर्यंत सर्वांना या कामावर हजर राहावे लागणार आहे.

BLO च्या कामामुळे पुण्यातील अनेक शाळा होणार बंद? संस्थाचालक हतबल; विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहाय्यक म्हणून शिक्षकांना नियुक्त न करता इतर कर्मचाऱ्यांना नियुक्त करावे, असे आदेश धाराशिव जिल्हाधिकारी यांनी नुकतेच काढले आहेत. मात्र, पुण्यातील एकाच शाळेमधील तब्बल 59 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 'एसआयआर' च्या अनुषंगाने कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे ही शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. केवळ एकच नाही तर पुणे शहर व ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांना 'एसआयआर' चे राष्ट्रीय कार्य देण्यात आले आहे. हे काम टाळता येणार नसल्याने संस्थांचालकांना शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणार कोण ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची एसआयआर साठी नियुक्ती केली आहे. या कामाच्या ताणामुळे काहींचा हृदयविकाराने मृत्यू झाला; तर काहींचा कामावर जात असताना अपघाती मृत्यू झाला. एका शिक्षकाला प्रांत अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याची घटनाही नुकतीच घडली. मात्र असे असताना सर्व शिक्षक निमुटपणे जिल्हा प्रशासनाने दिलेले काम करत आहेत. काम करणे टाळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे या भीतीपोटी सर्वच निमुटपणे कामावर हजर राहत आहेत. 

पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील तब्बल 59 कर्मचाऱ्यांना बीएलओच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. येत्या 29 जुलैपर्यंत सर्वांना या कामावर हजर राहावे लागणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची शाळा सकाळी व दुपारी अशा दोन्ही सत्रांमध्ये भरते. मात्र, दोन्ही सत्रातील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिल्यामुळे शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच उरले नाहीत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून काही शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. परंतु, शाळेतील सर्वच शिक्षकांना एक महिन्यासाठी एसआयआर साठी नियुक्त केले आहे. सर्व शाळा या सकाळ व दुपार या दोन शिफ्ट मध्ये चालतात. परंतु शिक्षक व कर्मचारी नसल्यामुळे आम्हाला शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत. 

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे  कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, एसआयआरच्या कामासाठी आमच्या संस्थेतील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नियुक्त करण्यात आले आहे. सध्या महाविद्यालयामधील प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू आहे. परंतु, कर्मचारी नसल्यामुळे त्याचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत आहे. जिल्हा प्रशासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या कामातून तातडीने वगळावे. केवळ प्रशासकीय नाही तर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम होत आहे.

दरम्यान, याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील काधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच धाराशीव येथील जिल्हाधिकारी शिक्षकांना या कामातून वगळत असतील तर पुण्यात या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.