बालभारतीच्या पुस्तकात अक्षम्य चुका ! शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीखच पुस्तकात बदलण्यात आली आहे. वास्तविक निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले असताना, बालभारतीच्या पुस्तकात २७ एप्रिल १९२० अशी चुकीची माहिती छापण्यात आली आहे. केवळ इतिहासच नव्हे, तर लांबी-वजन मापन आणि भागाकार या मूलभूत प्रकरणांमधील आकड्यांमध्येही मोठ्या गडबडी आढळल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेवर (Maharashtra Education System) पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बालभारतीने प्रकाशित केलेल्या इयत्ता चौथीच्या गणिताच्या नवीन पाठ्यपुस्तकात अनेक अक्षम्य चुका (Unforgivable mistakes in the book) समोर आल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी थेट खेळ (Playing with students' futures) केला गेला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू झालेल्या नव्या अभ्यासक्रमानुसार दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांचे वितरण झाले असताना, शाळा सुरू होताच चौथी गणित पुस्तकातील (4th Mathematics Book) घोळ उघडकीस आला आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे, थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीखच पुस्तकात बदलण्यात आली आहे. वास्तविक निधन २६ एप्रिल १९२० रोजी झाले असताना, बालभारतीच्या पुस्तकात २७ एप्रिल १९२० अशी चुकीची माहिती छापण्यात आली आहे. केवळ इतिहासच नव्हे, तर लांबी-वजन मापन आणि भागाकार या मूलभूत प्रकरणांमधील आकड्यांमध्येही मोठ्या गडबडी आढळल्या आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या पुस्तकांमध्ये हा प्रकार घडला असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची तीव्र निंदा केली. “एकीकडे पेपरफुटीचे प्रकार थांबत नाहीत, तर दुसरीकडे प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमातच अशा गंभीर चुका करणे ही शिक्षण व्यवस्थेची लाजिरवाणी अवस्था आहे,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तातडीने उत्तर देण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे.
पालक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मते, निव्वळ शुद्धीपत्रक काढून हे नुकसान भरून काढता येणार नाही. ज्या पालकांनी पुस्तके विकत घेतली आहेत, त्यांना जुन्या पुस्तकांच्या बदल्यात नवीन सुधारित पुस्तके मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. तसेच, बालभारतीच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला थारा मिळणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता आणखी खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू असताना पुस्तकांमध्येच अशा मूलभूत चुकांचा समावेश होणे हे अक्षम्य आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या मनात चुकीचे ज्ञान रुजवले जाण्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत त्वरित भूमिका स्पष्ट करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला पुन्हा एकदा विश्वासार्हता मिळवायची असेल तर अशा गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.