अहमदनगर प्राध्यापक भरती घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विद्यापीठाला नोटीस; १० मार्चला पुन्हा सुनावणी 

विद्यापीठाने भरती प्रक्रिया राबविल्यानंतर पात्र उमेदवारांचे निवड यादी प्रसिद्ध केले.परंतु या निवड यादीमध्ये एस.टी. संवर्गातील विद्यार्थिनीची निवड ही एस.सी. संवर्गातून करण्यात आल्याचे आढळून आले.

अहमदनगर प्राध्यापक भरती घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विद्यापीठाला नोटीस; १० मार्चला पुन्हा सुनावणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सुमारे दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेमधील प्राध्यापक भरती घोटाळ्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आता येत्या १० मार्च रोजी होणार आहे.न्यायालयात दाखल करण्यात आलेली अवमान याचिका स्वीकारण्यात आली असून त्यावर आता विद्यापीठाला नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत,अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, या भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्यामुळे त्यावर न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने पूर्वी केलेली भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले. भरती प्रक्रिया राबविताना विद्यापीठाने कोणत्या गोष्टींचे पालन करावे, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यानुसार विद्यापीठाने सर्व भरती प्रक्रिया काटेकोर पद्धतीने राबवण्यासाठी आवश्यक तयारी केली. परंतु विद्यापीठाने भरती प्रक्रिया राबविताना न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले नसल्याचा आरोप करत काही उमेदवारांनी याप्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून त्यावर आता विद्यापीठासह  संबंधितांना नोटीस जारी केली जाणार आहे. त्यात संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्यासह उच्च शिक्षण संचालक यांनाही नोटीस पाठवले जाणार आहे.

शिक्षण विद्यापीठाला कुणी कुलसचिव देतं का कुलसचिव..

विद्यापीठाने भरती प्रक्रिया राबविल्यानंतर पात्र उमेदवारांचे निवड यादी प्रसिद्ध केले.परंतु या निवड यादीमध्ये एस.टी. संवर्गातील विद्यार्थिनीची निवड ही एस.सी. संवर्गातून करण्यात आल्याचे आढळून आले. त्यावरच उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. तसेच उमेदवारांच्या मुलाखती घेताना न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार समितीमध्ये सदस्य उपस्थित नसल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे न्यायालयाने बजावलेल्या नोटीस प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ त्याला काय उत्तर देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पात्र उमेदवार दुखावले 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून  विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर राबविण्यात आलेल्या भरतीमधून निवड झालेल्या उमेदवारांची आम्हालाच नोकरीवर रुजू करून घ्या, अशी अपेक्षा आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यापीठातर्फे राबविण्यात आलेल्या भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीवर रुजू करून घ्यावे, अशी अपेक्षा हे उमेदवार व्यक्त करत आहेत. मात्र या सर्व प्रक्रियेत वारंवार गोंधळ होत असल्यामुळे सर्व पात्र उमेदवार नाराज आहेत.