कुंभमेळ्यातील श्रमदानाचे विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण; विद्यार्थी संघटनांचा विरोध,विद्यापीठ करणार पुनर्विचार

विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कुंभमेळ्यातील श्रमदानास श्रेयांक गुण देण्याच्या निर्णयाला विरोध केला. तसेच निर्णय मागे न घेतल्यास विद्यापीठात बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला.

कुंभमेळ्यातील श्रमदानाचे विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण; विद्यार्थी संघटनांचा विरोध,विद्यापीठ करणार पुनर्विचार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळात घेण्यात आला. परंतु,  शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कुंभमेळ्यात सहभागी होण्याचे बंधन घालून धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक प्रचार कार्य देऊ नये,असा आक्षेप घेत विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कुंभमेळ्यातील श्रमदानास श्रेयांक गुण देण्याच्या निर्णयाला विरोध केला. तसेच निर्णय मागे न घेतल्यास विद्यापीठात बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर विद्यापीठाने या निर्णयाचा फेरविचार केला जाईल,असे परिपत्रक प्रसिद्ध केले.

नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना विविध व्यवस्थापनाशी निगडित कामे करता येऊ शकतात. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे शिक्षण घेता येऊ शकते, या उद्देशाने विद्यापीठाच्या अधिकार मंडळात कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक गुण देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. विद्यापीठाने या प्रस्तावास मंजुरी दिली. परंतु विविध विद्यार्थी संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेत विरोध नोंदवला. 

संविधानाने सर्वांना धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर लाभता येणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी केली. पालखी सोहळा गणेशोत्सव या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवता येतो. परंतु सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत बंधन घातले जात नाही. त्यामुळे विद्यापीठाने कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणे ऐच्छिक करावे ,अशी मागणी करण्यात आली.

 विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी व प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर यांची भेट घेऊन विवेक बनसोडे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यात दोन श्रेयांक देण्याचा विषय हा पूर्णतः ऐच्छिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच या चर्चेदरम्यान उपस्थित झालेले विविध मुद्दे विद्यापीठाच्या अधिकार मंडळासमोर ठेवून त्यावर फेरविचार केला जाईल,असेही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.