गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी घ्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची मोलाची भूमिका असून शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन भुसे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 'गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती' विषयावर ते  बोलत होते. 

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी घ्या, सर्व प्रश्न मार्गी लावतो शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाकडून वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. तुम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची (Quality education) जबाबदारी घ्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील,असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांनी संस्थाचालकांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची मोलाची भूमिका असून शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही भुसे यांनी यावेळी केले.

मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Center) मध्ये 'गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती' या विषयावर ते बोलत होते.या कार्यक्रमाला शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह सुमारे १२५ संस्थाचालक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.

संस्थाचालक आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, ११ वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे आदी मांडलेल्या मुद्यांचा विचार केला जाईल. शाळा पातळीवरील अडचणी तीन महिन्यांत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दादा भुसे म्हणाले. तर शिक्षण क्षेत्रातील घटकांसोबत शिक्षणमंत्र्यांनी दोन महिन्यांतून एकदा अशी चर्चासत्रे घ्यावीत अशा सूचना संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी केल्या. 

दादा भुसे म्हणाले, शिक्षणाच्या बाबतीत देशात राज्याचा नाव लौकिक निर्माण करायचा असेल, तर शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय बदलावे लागतील. त्यासाठी येत्या आठवड्यात राज्य शैक्षणिक आराखडा तयार केला जाईल. कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. शालेय शिक्षण विभागाचा कृतीवर अधिक भर असून चांगल्या कामास, उपक्रमास सरकार सहकार्य करेल.