धर्म केवळ धार्मिक संकल्पना नाही; तर आचारसंहितेची जीवनपद्धती: राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
सनातन धर्मा’सोबतच ‘युगधर्म’ आणि ‘कालधर्म’ यांचीही संकल्पना आहे. काळानुसार बदल होत असले तरी धर्माचे मूळ तत्त्व मानवतेच्या उत्कर्षावर आधारित आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय तत्त्वज्ञानातील ‘एकात्म मानव दृष्टिकोण’ हीच खरी जागतिक मानवतेची दिशा आहे. भारतीय संस्कृती ही एकात्मता, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित असून ‘धर्म’ ही केवळ धार्मिक संकल्पना नसून सभ्य आचारसंहितेची जीवनपद्धती आहे,” असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल मा. आरिफ मोहम्मद खान यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे भारतीय तत्त्वज्ञान अनुसंधान नवी दिल्ली, केंद्रीय हिन्दी निदेशालय (नवी दिल्ली) आणि सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्च (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एकात्म मानवदर्शन आणि त्याची समकालीन प्रासंगिकता’ या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, सेंटर फॉर इंटेग्रल स्टडीज अँड रिसर्चचे हरिभाऊ मिरासदार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, संदीप पालवे, सागर वैद्य ,बागेश्री मंठाळकर ' संगीता जगताप, अधिष्ठाता प्रा. विजय खरे , प्रा. सुप्रिया पाटील , प्रा. संजय तांबट ,अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर, शंतनु लामधाडे आदी उपस्थिती होते.
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले, “भारतीय तत्त्वज्ञानात ‘सनातन धर्मा’सोबतच ‘युगधर्म’ आणि ‘कालधर्म’ यांचीही संकल्पना आहे. काळानुसार बदल होत असले तरी धर्माचे मूळ तत्त्व मानवतेच्या उत्कर्षावर आधारित आहे. राम आणि कृष्ण हे अनुक्रमे ‘मर्यादा पुरुषोत्तम’ आणि ‘लीलापुरुषोत्तम’ असले तरी दोघांचे उद्दिष्ट एकच होते, समाजातील नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणे .”
शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले, “‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे विचार आत्मा आणि परमात्म्याच्या एकत्वाचा संदेश देतात. या आध्यात्मिक एकात्मतेतूनच खऱ्या मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा उदय होतो. विविधतेतून एकता हेच भारतीय तत्त्वज्ञानाचे खरे वैशिष्ट्य आहे.”