पुणे शहर ठरणार पुस्तकांची पंढरी : विश्वास पाटील यांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन
पुणे पुस्तक महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; पुढील आठ दिवस साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
ग्रंथांचा पुस्तकांच्या वाचनातून आनंद घेणार असाल, तर तुमच्यासाठी स्वर्ग निर्माण होऊन, जीवनात सुखी होणार आहात. उत्तम ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथाशिवय पर्याय नाही. ग्रंथ हे माणसाचे मित्र असून, ते शाळेत आणि महाविद्यालयात सोबत असतात.तसेच पुणे पुस्तक महोत्सवाच्या संयोजकांनी नव्या तंत्रयंत्र युगात ग्रंथांवर आणि पुस्तकांवर प्रेम करण्याची पालखी खांद्यावर घेतली आहे. या पालखीच्या माध्यमातून उत्तमोत्तम विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. त्याचप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहर हे आगामी काळात पुस्तकांची पंढरी ठरणार आहे, असे मत 99 व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी जल्लोषात उद्घाटन झाले. यावेळी पाटील बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद कटिकर, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकूर, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले, प्रत्येक भारतीय माणसाचा सहा तासांचा वेळ मोबाईलवर जात आहे, हे फार गंभीर आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती मध्ये सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत मुलांना मोबाईल न देण्याबाबत निर्णय झाला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन माझ्या उपस्थितीत झाले, याचा आनंद वाटत आहे. यानिमित्ताने पुण्यात ग्रंथांची पेठ उभी राहत आहे.
मोहोळ म्हणाले , गेल्या दोन पुणे पुस्तक महोत्सवाच्या शेवटी होणारी गर्दी ही यंदाच्या पहिल्याच वर्षी झाली आहे. त्यामुळे पुणेकर या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, हे स्पष्ट झाले आहे. पुणे पुस्तक महोत्सवाने स्वतःची ओळख बनवली आहे. वाचन चळवळ वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहर हे साहित्य, कला, संस्कृती याचे मानबिंदू आहे. पुणे पुस्तक महोत्सवात वाचकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. महोत्सवात विक्रमी पुस्तक विक्री झाली. भविष्यात हे महोत्सव ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तेथे ग्रंथालय, वाचनालय निर्माण करावे लागतील. पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुण्याचे नावे जगभर जावे. त्यातून मराठीसह इतर प्रादेशिक भाषांचा विस्तार व्हावा.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सामाजिक आणि शैक्षणिक कामात मदत करताना खर्चाचा विचार करायचा नसतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १०० रुपयांचे कूपन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयांना पुस्तके खरेदी करण्यासाठी १० हजार रुपयांचे कूपन देण्यात येत आहे. आपले पुणे शहर हे पुस्तकांची राजधानी पुणे व्हावे, अशी आपल्या सर्वाची मागणी आहे. पुढच्या २०२६ वर्षासाठी पुस्तकांची राजधानी घोषित झाली आहे. त्यामुळे २०२७ मध्ये पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी बनविण्यासाठी पुणेकरांनी पुढील आठ दिवस मोठ्या संख्येने भेट देऊन, पुस्तकांची खरेदी करायची आहे. पुढचा पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पातळीवरील पुस्तक महोत्सव करायचा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.काटीकर यांनी आभार मानले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दिल्लीस्थित पराशर बँडने सादरीकरणातून नागरिकांची मने जिंकली.
---
पुढील पुणे पुस्तक महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणार
पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ एक संस्थेचा नसून, हा पुणेकरांचा महोत्सव झाला आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेली गर्दी ही अलोट आहे. गेल्या वर्षी हीच गर्दी शेवटच्या दिवशी झाली होती. त्यामुळे यंदाचा पुस्तक महोत्सव सर्व विक्रम मोडीत काढणार आहे. या पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य जनतेसमोर आणले आहे. पुढील पुणे पुस्तक महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणार आहे. सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर हे आगामी काळात पुस्तकांची राजधानी ओळखली जाईल. त्यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.
___________
पुस्तक महोत्सव कुणी सुरू केला ?
आधुनिक काळात गावाची ओळख त्या गावात काय घडतं, यावर अवलंबून असते. मुळा मुठेच्या किनारी हा ज्ञानयज्ञ थाटलेला आहे. अशा पद्धतीचा पुस्तक महोत्सव केवळ दिल्ली आणि कलकत्ता येथेच होतो. अवघ्या दोन वर्षात पुणे पुस्तक महोत्सवाने या दोन्ही महोत्सवाची बरोबरी केली आहे. पन्नास वर्षाने पुणे पुस्तक महोत्सव कुणी सुरू केला, असा प्रश्न आल्यास. नागरिक राजेश पांडे आणि मिलिंद मराठे यांची नावे घेतील, अशा शब्दांत विश्वास पाटील यांनी आयोजकांवर गौरवोद्गार काढले.
eduvarta@gmail.com