पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शार्दुल जाधवर यांना पत्र, व्यक्त केली कृतज्ञता

जाधवर ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते शार्दुल सुधाकरराव जाधवर यांनी विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी जाधवार यांचे आभार मानत देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर सविस्तर भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शार्दुल जाधवर यांना पत्र, व्यक्त केली कृतज्ञता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने 'एनडीए'ला (NDA) दिलेला कौल हा केवळ विजय नसून, तो विकास, स्थैर्य आणि सुशासनावर शिक्कामोर्तब करणारा आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यात जनतेचा हा अभूतपूर्व पाठिंबा आणि 'जनभागीदारी' हीच आमची सर्वात मोठी ताकद असल्याचे पंतप्रधानांनी शार्दुल जाधवर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

जाधवर ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते शार्दुल सुधाकरराव जाधवर यांनी विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. या पत्राला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी जाधवार यांचे आभार मानत देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर सविस्तर भाष्य केले आहे.

पंतप्रधानांनी पत्रात म्हटले आहे की, या निवडणुकांमधील मतदानाचा अभूतपूर्व टक्का हा भारतीय लोकशाही तळागाळात मजबूत होत असल्याचे लक्षण आहे. विशेषतः महिलांचा वाढता आणि उत्स्फूर्त सहभाग अत्यंत प्रेरणादायी असून, 'विकसित भारत' घडवण्यात 'नारी शक्ती' आता महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, ज्या राज्यांमध्ये एनडीएचे सरकार होते, तिथे जनतेने सरकारच्या कामावर विश्वास दाखवत 'प्रस्थापित अनुकूल' (Pro-incumbency) कौल दिला आहे. याउलट, बिगर-एनडीए राज्यांमध्ये जनतेने प्रस्थापित विरोधी भूमिका घेतली. आमचे लोककल्याणकारी निर्णय कोट्यवधी जनतेच्या मनापर्यंत पोहोचल्याचेच हे प्रमाण आहे. आसाममध्ये ऐतिहासिक तिसऱ्यांदा मिळालेली सत्ता आणि पुद्दुचेरीतील जनतेने दाखवलेला विश्वास याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पश्चिम बंगालमधील निकालांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तिथल्या जनतेने शांतता आणि प्रगतीच्या राजकारणाला दिलेला पाठिंबा म्हणजे एका नव्या आकांक्षा आणि संधींच्या युगाची पहाट आहे. तसेच केरळ आणि तामिळनाडूमध्येही भाजप आणि एनडीए जनतेच्या प्रश्नांसाठी अविरत संघर्ष करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हा ऐतिहासिक जनादेश एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. आगामी काळात गरिबांचे कल्याण, तरुणांचे सक्षमीकरण, महिलांचा सन्मान व त्यांना नव्या संधी देणे आणि शेतकऱ्यांची समृद्धी या चार सूत्रांवर आमचे सरकार सर्वोच्च प्राधान्याने काम करेल," असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राद्वारे व्यक्त केला आहे. शेवटी पत्रात त्यांनी शार्दुल जाधवर यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.