अंगणवाड्यांच्या समस्यांवर मंत्र्याची आश्वासने, पण प्रश्न कायम; आंदोलने सुरूच राहणार

कृती समितीने बुधवारी मंगल प्रभात लोढा यांची भेट घेत विविध मागण्या मांडल्या. नियमितपणे एकत्रित मानधन देणे, वाढीव मानधन त्वरित सुरू करणे, थकित सेवासमाप्ती लाभ अदा करणे आदी मागण्या करण्यात आल्या.

अंगणवाड्यांच्या समस्यांवर मंत्र्याची आश्वासने, पण प्रश्न कायम; आंदोलने सुरूच राहणार
Anganwadi Workers demand

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महिला व बालविकास (WCD) मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यासह प्रशासकीय पातळीवर अंगणवाड्यांचे (Anganwadi) प्रश्न तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली जात आहे. प्रश्न सोडविण्याची आश्वासने मिळत आहेत. पण अजूनही अनेक प्रश्न सुटलेले नाहीत.त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून प्रकल्प व जिल्हा पातळीवर ठरलेली आंदोलने (Protest) पूर्ण ताकदीनिशी करण्याचा निर्धार बुधवारी केला.

कृती समितीने बुधवारी मंगल प्रभात लोढा यांची भेट घेत विविध मागण्या मांडल्या. नियमितपणे एकत्रित मानधन देणे, वाढीव मानधन त्वरित सुरू करणे, थकित सेवासमाप्ती लाभ अदा करणे, मानधनाच्या निम्मी मासिक पेन्शन, ग्रॅच्युइटी लागू करणे, नवीन मोबाईल, थकित भाडे, इंधन भत्ता, प्रवास भत्ता, रिचार्ज, परिवर्तन निधी त्वरित अदा करणे, मागील उन्हाळी सुट्टी, भाडे वाढ, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, छापिल रजिस्टर देणे आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या.

वारे गुरूजींनी करून दाखवलं; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय शाळा

त्याचप्रमाणे मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करणे, सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात होणाऱ्या वाढीची थकित रक्कम देणे, दुर्गम भागाचा भत्ता पुन्हा लागू करणे आदी मागण्यांवर कृती समितीचे निवेदन सादर करण्यात आले. मंत्र्यांनी चर्चा करून या प्रश्नांवर जून अखेरपर्यंत कृती समिती सोबत विभागाची बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली.

शिष्टमंडळाने नव्याने नियुक्त झालेले प्रधान सचिव अनूप यादव यांची भेट घेतली. त्यांनी प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. मानधन यापुढे वेळेवर मिळेल, भाडेवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे, थकित सेवासमाप्ती लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत नवीन मोबाईल देण्यात येणार, पेन्शन, ग्रॅच्युइटी बाबत अभ्यास करून प्रस्ताव तयार केले जातील, सर्व थकित देयके लवकरच देण्यात येतील, आदी माहिती त्यांनी दिली.

चर्चा सकारात्मक झाली, परंतु आयुक्तांकडून आत्तापर्यंत अपेक्षित कार्यवाही न झाल्याबद्दल कृती समितीने खंत व्यक्त केली. शिष्टमंडळात एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, अतुल दिघे, त्रिशिला कांबळे, संगीता कांबळे, राजेश सिंग यांचा समावेश होता, अशी माहिती कृती समितीकडून देण्यात आली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo