फार्मसी कॉलेजची १ मार्चपर्यंत बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करा, अन्यथा प्रवेश बंदी कारवाई
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध झालेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानंतर विविध परिपत्रकांद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप अनेक संस्थांनी नोंदणी व प्रणाली कार्यान्वयन पूर्ण केले नसल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
राज्यासह देशातील औधषनिर्माणशास्त्र महाविद्यालयांसाठी (College of Phrmacy) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) देशातील सर्व मान्यताप्राप्त औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना आधार लिंक बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची (एईबीएएस) नोंदणी व त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया १ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश (Biometric process mandatory directive) दिले आहेत, अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशाला मान्यता देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध झालेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानंतर विविध परिपत्रकांद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप अनेक संस्थांनी नोंदणी व प्रणाली कार्यान्वयन पूर्ण केले नसल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले आहे. १ मार्चपूर्वी मान्यताप्राप्त बायोमेट्रीक यंत्रे खरेदी करून बसविणे व त्यांची नोंद परिषदेच्या केंद्रीकृत उपस्थिती संकेतस्थळावर कराव्या. सर्व प्राध्यापक व अध्यापक कर्मचाऱ्यांची (वैध ओळख क्रमांकासह) केंद्रीकृत उपस्थिती प्रणालीवर नोंदणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
मान्यताप्राप्त बायोमेट्रिक यंत्रांची खरेदी व इन्स्टॉलेशन संस्थेने करावे. तसेच 'डीजी-फार्ड' संकेतस्थळावरील 'एईबीएएस' विभागात त्याची नोंद अद्यावत करावी. संस्थात्मक नोंदणी करून सर्व अध्यापकांची (वैध बीएच-पी ओळख क्रमांकासह) केंद्रीकृत एईबीएएस संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करावी. सर्व अध्यापकांची पडताळणी करून त्यांना सक्रिय करणे व यंत्रांसोबत जोडावे. अधिकृत अध्यापकांनी नियमितपणे बायोमेट्रीक यंत्रावर उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. तांत्रिक अडचणी अथवा तक्रारींसाठी संबंधित संस्थांनी परिषदेच्या तक्रार निवारण संकेतस्थळावर अर्ज करावा, असेही कळविण्यात आले आहे. परिषदेचे निबंधक आणि सचिव अनिल मित्तल यांनी सर्व संस्थांनी मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा येत्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश बंदीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.