परख सर्वेक्षण अहवाल जाहीर; महाराष्ट्राचा देशात ८ वा क्रमांक, कोल्हापूरची पोरं हुश्शार....

सर्वेक्षणात राज्य शासनाच्या शाळांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्तम कामगिरी केली असली तरी एकूणच माध्यमिक स्तरावर अजूनही सुधारणा आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.

परख सर्वेक्षण अहवाल जाहीर; महाराष्ट्राचा देशात ८ वा क्रमांक, कोल्हापूरची पोरं हुश्शार....

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परख (Performance Assistment, Review and Analysis of Knowledge for Holistic Development) ही राष्ट्रीय मूल्यांकन संस्था स्थापन करण्यात आली आहे.या संस्थेच्या माध्यमातून   करण्यात आलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणात देशातील विविध राज्यांनी सहभाग घेतला. सर्व राज्यांनी केलेल्या कामगिरीचा विचार करता पंजाब व केरळ पहिल्या क्रमांकावर (Punjab and Kerala are at the top)असून महाराष्ट्र सरासरी देशात आठव्या स्थानावर आहे.तर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता महाराष्ट्र 6 व्या क्रमांकावर असून इयत्ता 6 वी व 9 वी चा विचार करता महाराष्ट्र अनुक्रमे सातव्या व दहाव्या क्रमांकावर आहे. या सर्वेक्षणातून कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी (Students from Kolhapur district) सर्वाधिक हुशार असल्याचे आढळून आले आहे.

परख संस्थेच्या माध्यमातून चार डिसेंबर 2024 रोजी देश पातळीवर राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये इयत्ता तिसरी, सहावी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले गेले. महाराष्ट्रातील 4 हजार 314 शाळा 13 हजार 930 शिक्षक आणि एक लाख 23 हजार 69 विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. इयत्ता तिसरी, सहावी आणि नववी या इयत्ता मधील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांसाठीचे मूल्यांकन करण्यात आले. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 व परखराष्ट्रीय सर्वेक्षण 2024 यांची तुलना करता इयत्ता नववी गणित विषय वगळता सरासरी संपादणूक यामध्ये तीन टक्के वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्वेक्षणात राज्य शासनाच्या शाळांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्तम कामगिरी केली असली तरी एकूणच माध्यमिक स्तरावर अजूनही सुधारणा आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.

सर्वेक्षण अहवालानुसार देश पातळीवर महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर, सातारा, मुंबई ,रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यानी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. इयत्ता तिसरीचा विचार करता लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर व पालघर यांची संपादणूक कमी आहे. इयत्ता सहावी मध्ये वर्धा औरंगाबाद गोंदिया गडचिरोली रायगड हे जिल्हे मागे आहेत तर इयत्ता नववी चा विचार करतात अकोला नंदुरबार परभणी गडचिरोली आणि मुंबई उपनगर हे जिल्हे मागे आहेत.