डॉ.मनाली क्षीरसागर नागपूर विद्यापीठाला पहिल्या महिला कुलगुरू; नियुक्तीची घोषणा
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी रविवारी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. चार जणांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यातून डॉ. क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. डॉ. क्षीरसागर या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे तांत्रिक संचालिका व सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाला दीर्घकाळानंतर पूर्ण वेळ कुलगुरू मिळाल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) नवा इतिहास घडवला आहे. विद्यापीठाला पहिल्यांदा महिला कुलगुरू मिमिळाल्या आहेत. डॉ. मनाली क्षीरसागर (Dr. Manali Kshirsagar) यांची नुकतीच निवड करण्यात (Dr. Manali Kshirsagar elected as Vice Chancellor) आली आहे. नागपूर विद्यापीठाला आपल्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णवेळ महिला कुलगुरू लाभल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत (Governor Acharya Devvrat) यांनी डॉ. क्षीरसागर यांच्या नियुक्तीची आदेशाद्वारे घोषणा केली.
नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी रविवारी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. चार जणांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यातून डॉ. क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. डॉ. क्षीरसागर या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे तांत्रिक संचालिका व सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाला दीर्घकाळानंतर पूर्ण वेळ कुलगुरू मिळाल्या आहेत. डॉ. सुभाष चौधरी यांच्यानंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद मागील सुमारे एक वर्षापासून रिक्त होते. यापूर्वी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडे विद्यापीठाचा प्रभार देण्यात आला होता. डॉ. क्षीरसागर या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्याकडून कुलगुरूपदाचा प्रभार बुधवारी स्वीकारतील. पाच वर्षांचा कार्यकाळ किंवा वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत त्या कुलगुरूपदावर राहतील.
हेही वाचा - शिक्षण व्हिएसके' घेणार विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी, शाळांना मार्गदर्शक सूचना
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर या कम्प्युटर इंजिनीअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. अध्यापनासह विविध पदांचा तब्बल ३३ वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. डॉ. क्षीरसागर यांनी कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये बीई, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये एमई तर कम्प्युटर सायन्स या विषयात पीएचडी केली आहे. ५४ वर्षीय डॉ. क्षीरसागर यांनी नागपूर, अमरावती विद्यापीठांसह प्रयागराज येथील सॅम हिगिनबॉटम विद्यापीठातून पीएचडीपूर्ण केली आहे.
१६ वर्षे पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून काम करण्यासह वायसीसीई समूहातील विविध संस्थांमध्ये विभागप्रमुख, प्राचार्य, तांत्रिक संचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांना अध्यापन, संशोधन आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय पीअर-रिव्ह्यू जर्नल्समध्ये संशोधन लेख आणि कम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग विषयातील विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात १३ संशोधकांनी आपली पीएचडी पूर्ण केली आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ई-कॉर्सेस व नावीन्यपूर्ण अध्यापन साधनांच्या निर्मितीतही डॉ. क्षीरसागर यांनी योगदान दिले असून त्यांच्या नावे तीन पेटंटही आहेत. विविध शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
eduvarta@gmail.com