एमपीएससीचे ढिसाळ धोरण! ३ महिने उलटले तरी निकाल नाही, उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष
सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळपणाचा फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक उमेदवार आपल्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतात मात्र आयोगाकडून वेळेत निकाल जाहीर केला जात नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ढिसाळपणाचा फटका राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक उमेदवार आपल्या निकालाच्या प्रतीक्षेत (Candidate awaiting results)आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतात मात्र आयोगाकडून वेळेत निकाल जाहीर केला जात नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदा नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यसेवा परीक्षा (Examination according to the new syllabus) घेण्यात आली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ (Civil Services Combined Preliminary Examination 2025) होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. वेळेत निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवताच आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ ते २८ तारखेपर्यंत राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयोगाच्या या उदासिन धोरणामुळे मुख्य परीक्षेच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, यूपीएससीची परीक्षा पद्धत स्वीकारणाऱ्या आयोगाला त्यांची तत्परता का स्वीकारता येत नाही? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या पूर्व परीक्षेची दुसरी उत्तरतालिका २ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही अंतिम निकालाबाबत आयोग मूग गिळून गप्प आहे. विशेष म्हणजे, राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती अभ्यासासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी उरणार आहे.
वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे सांगत, आयोग जाणीवपूर्वक उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर ढकलत असल्याचा आरोप परीक्षार्थी करत आहेत. पुण्यासारख्या शहरात राहून मेस, खासगी रुमचा खर्च सोसणाऱ्या उमेदवारांवर आर्थिक-मानसिक तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीही मुख्य परीक्षेसाठी वेळ मिळत नाही म्हणून आंदोलन करावे लागले होते, यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षार्थी नितीन आंधळे यांनी दिली. आयोगाने तातडीने निकाल जाहीर करावा आणि या विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्याने केली. अन्यथा, हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा परीक्षार्थी देत आहेत.
__________________________________________
"राज्यसेवेची मुख्य परीक्षा २९ मार्च २०२६ पासून नियोजित आहे. निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तीर्ण उमेदवारांच्या हाती अभ्यासासाठी केवळ ४० दिवसांचा कालावधी उरणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेची तयारी इतक्या कमी वेळात करणे अशक्य आहे."
राहूल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
_________________________________________
"महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी घेतली. मात्र. या परीक्षेचा निकाल अद्याप लागला नाही. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. वेळेत निकाल लागला तर मुख्य परीक्षाची तयारी करायला विद्यार्थ्यांना नियोजन करता येत. लवकरात लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा."
- महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन