अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ: सुसंस्कृत सुदृढ महाराष्ट्र घडण्यासाठी वेळ लागणार नाही: उदय सामंत
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयाेजित नवव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उदय सामंत बाेलत हाेते. यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन उपस्थित हाेते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
परदेशात राहणाऱ्यांना मराठी शिकविण्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे (Ajinkya d. Y. Patil University)अभ्यासक्रम तयार करणार असल्याची माहिती उद्याेग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली. शिक्षण संस्था चालकांची या प्रकारची सकारात्मक मानसिकता असेल तर सुसंस्कृत सुदृढ महाराष्ट्र घडण्यासाठी वेळ लागणार नाही, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयाेजित नवव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उदय सामंत बाेलत हाेते. यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन उपस्थित हाेते. यावेळी उदय सामंत यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मानद डाॅक्टरेट ( डी. लिट) देऊन सन्मान करण्यात आले.
उदय सामंत म्हणाले, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार मिळत आहेत. ते आत्मसात करून विद्यार्थी देश घडविणार आहेत. यामध्ये अजिंक्य पाटील यांचे याेगदान माेठे आहे. पुण्यातील विश्व साहित्य संमेलनात महाराष्ट्राबाहेर राहणारे अनेक मराठी भेटले. त्यांनी खंत व्यक्त केली की आमची मुले माेठमाेठ्या शाळेत जातात. पण मातृभाषा मराठी बाेलताना त्यांना अडचण हाेते. यामुळे मी अजिंक्य पाटील यांना विनंती केली की तुमच्या विद्यापीठातर्फे असा अभ्यासक्रम तयार करू की परदेशात राहणाऱ्यांनाही मराठी शिकता येइल. परदेशी माणसांना मराठी शिकविण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.
उदय सामंत म्हणाले, तुम्ही शिकून माेठे झाल्यावर तुमच्या हाताला राेजगार मिळावा यासाठी उद्याेग मंत्री या नात्याने दावाेसला जाऊन15 लाख 70 हजार काेटी रुपयांचे करार करून आलाे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे ऐतिहासिक काम घडले. विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आहे की ज्या क्षेत्रामध्ये काम कराल त्या क्षेत्राचे नावलाैकिक तुमच्यामुळे वाढेल. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जाेपासून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करावे.
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट प्रदान झाल्यावर मंत्री उदय सामंत भावुक झाले. ते म्हणाले. मी डाॅक्टर व्हावे अशी माझ्या आई - वडीलांची इच्छा हाेती.आजपासून माझ्याही नावासमाेर डाॅ. लागणार आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची नाेंद घेऊन डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी डाॅक्टरेट प्रदान करून माझा सन्मान केला.
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील म्हणाले, नव्या तंत्रज्ञानाची आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहायला हवे. यासाठी तुम्हाला इनोव्हेटिव्ह विचार करावा लागेल. विविध प्रकारची कौशल्ये मिळवावी लागतील. एडीवायपीयू इनोव्हेशनचे हन बनत आहे. आज पदवी मिळाली असली तरी शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. विद्यापीठाच्या आवारात 600 बेडचे हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. माझे वडील डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांची मुहूर्तमेढ रोवली. खर्च परवडत नसल्याने वंचित राहणाऱ्या सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी संघर्ष केला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल सुरू आहे.
कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन यांनी यावेळी विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घाेषणा त्यांनी केली.