कॉलेज सुरू होताच अकरावीच्या वर्गांची तपासणी; विद्यार्थी गैरहजर असल्यास मान्यता रद्द 

जून महिन्यात अनेक कॉलेजचे प्रवेश पूर्ण होतात. मात्र, अद्याप ५० टक्के सुध्दा प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाइन प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे जोपर्यंत पसंतीचे कॉलेज मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश घेत नसल्याचे दिसून येत आहे.

कॉलेज सुरू होताच अकरावीच्या वर्गांची तपासणी; विद्यार्थी गैरहजर असल्यास मान्यता रद्द 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षणाच्या नावावर सुरू असलेला कनिष्ठ महाविद्यालय आणि खाजगी क्लास चालकांचा गोरख धंदा आता बंद करावा लागणार आहे. कारण कॉलेज सुरू होताच शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या वर्गांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत विद्यार्थी गैरहजर असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द केली जाणार आहे, त्यामुळे अनेक कॉलेजचे पितळ उघडे पडणार आहे. 

केवळ पुण्यातच नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खाजगी क्लास आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी इंटिग्रेटेड कॉलेजच्या नावावर शिक्षणाचा बाजार मांडला. विद्यार्थ्यांनी केवळ कॉलेजमध्ये नावापुरते ऍडमिशन घ्यायचे आणि वर्षभर खाजगी क्लासमध्ये शिक्षण पूर्ण करायचे अशाप्रकारे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे गल्लीबोळात कॉलेज सुरू झाले. नामांकित कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची उपस्थिती नगन्य असल्याचे दिसून आले. मात्र, आता अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. जून महिन्यात अनेक कॉलेजचे प्रवेश पूर्ण होतात. मात्र, अद्याप ५० टक्के सुध्दा प्रवेश पूर्ण झालेले नाहीत. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाइन प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे जोपर्यंत पसंतीचे कॉलेज मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश घेत नसल्याचे दिसून येत आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळून आल्यास संबंधित कॉलेजची मान्यता रद्द केली जाईल, असे भाष्य केले होते. आता त्यावर अंमलबजावणी करण्याचे शिक्षण विभागाने ठरवले आहे. सध्या इंटिग्रेटेड कॉलेजच्या तपासणीची मोहीम शिक्षण विभागाकडून राबवली जात आहे. कॉलेजकडे असणाऱ्या सोयी सुविधांची सुद्धा त्यानिमित्ताने तपासणी केली जात आहे. मात्र, कॉलेज सुरू होताच शिक्षण विभागाकडून कॉलेज तपासणीचा धडाका लावला जाणार आहे.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक गणपत मोरे म्हणाले, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार आणि शिक्षण संचालकांच्या परिपत्रकानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासली जाणार आहे. वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळून आल्यास कनिष्ठ महाविद्यालयाला नोटीस बजावली जाईल. एक दोन वेळा विद्यार्थी वर्गात येत नसल्याचे तपासणीतून स्पष्ट झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर लक्ष देणे बंधनकारक आहे.

खाजगी क्लासच्या वेळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या वेळा बऱ्याच वेळा सारख्या असतात. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये जाण्याऐवजी क्लासमध्ये जाऊन बसतात. मात्र यापुढे असे चालणार नाही. नियमानुसार विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी असेल तरच संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावणे आवश्यक आहे, असेही गणपत मोरे यांनी सांगितले.