सीईटी प्रवेश आणि शिष्यवृत्तीची माहिती जिल्ह्यात मिळणार, प्रत्येक जिल्ह्यात 'विद्यार्थी सहाय्यता केंद्र' सुरु होणार 

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुलभ, त्वरित आणि प्रभावी मार्गदर्शन मिळावे यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत एकूण ४० विद्यार्थी मदत केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून ६ केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत.

सीईटी प्रवेश आणि शिष्यवृत्तीची माहिती जिल्ह्यात मिळणार, प्रत्येक जिल्ह्यात 'विद्यार्थी सहाय्यता केंद्र' सुरु होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, (CET Cell) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme) आणि प्रवेश संबंधित सर्व अडचणींसाठी (Admission-related difficulties) अचूक माहिती व मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय (Important decision) घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे (Student Support Centres) सुरू करण्यात येत आहेत. मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत, तर उर्वरित आठ केंद्रे लवकरच सुरू होणार आहेत, अशी माहिती शासन स्तरावरून देण्यात आली आहे. 

या सर्व केंद्रांवर १० जून २०२६ पासून विद्यार्थ्यांसाठी नियमित सेवा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह मार्गदर्शन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये वारंवार जाण्याची गरज भासणार नाही, असे  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना सीईटी व प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व तांत्रिक माहिती, शंका-निरसन, तक्रारींचे निवारण, अभ्यासक्रम व संस्थांची निवड करण्यासाठी व्यक्तिगत मार्गदर्शन, करिअर समुपदेशन आणि शिष्यवृत्ती योजनांची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. अर्ज भरणे, शुल्क भरणा, कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेशपत्रातील अडचणी सोडवणे आदी सेवा देखील एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

तांत्रिक समस्या, पेमेंट गेटवे अडचणी, छायाचित्र, स्वाक्षरी आणि दस्तऐवजीकरणातील त्रुटी यांसारख्या बाबी केंद्रांवर हाताळल्या जातील. आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय अधिकारी किंवा कार्यालयांकडे तक्रारी पाठवण्याची सुविधाही उपलब्ध असेल. याशिवाय आंतरवासिता आणि रोजगार संधींबाबतही मार्गदर्शन केले जाईल.

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुलभ, त्वरित आणि प्रभावी मार्गदर्शन मिळावे यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत एकूण ४० विद्यार्थी मदत केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून ६ केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित केंद्रांचे कामही वेगाने सुरू असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून ही मदत केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील.

चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री