विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्यात हमारी तुमरी; शाब्दिक बाचाबाची, एकमेकांवर धावले, आधिसभा स्थगित
व्यवस्थापन परिषद सदस्यांवर झालेल्या टीकेमुळे सभागृहाचे वातावरण तापले. सर्व व्यवस्थापन सदस्यांवर सरसकट टीका करू नये, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत शनिवारी अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. एकमेकांवर होत असलेल्या चिखल फेकीमुळे नाशिक जिल्ह्यातील अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य एकमेकांवर धावले. सुरक्षा कर्मचाऱ्यांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांना अधिसभेचे कामकाज स्थगित करावे लागले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये प्रथमच कुलगुरूंच्या भाषणापूर्वी स्थगन प्रस्ताव घेण्यात आले. या स्थगन प्रस्तावामध्ये विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेल्या जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावावरून वाद झाला. तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार न पडल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनावर टीका करण्यात आली. त्यात व्यवस्थापन परिषद सदस्यांवर झालेल्या टीकेमुळे सभागृहाचे वातावरण तापले. सर्व व्यवस्थापन सदस्यांवर सरसकट टीका करू नये, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.
सभागृहात चर्चा सुरू असताना व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य आणि अधिसभा सदस्य अशोक सावंत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सभागृह सुरू असताना दोघांमध्ये हमरी तुमरी झाली. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि सभागृहात उपस्थित असणाऱ्या इतर सदस्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सभागृहात तापलेले वातावरण पाहून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आधिसभेचे कामकाज काही कालावधीसाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
विद्यापीठाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या इतिहासात प्रथमच विद्यापीठाच्या कुलगुरूंचे भाषण न होता अधिसभेचे इतर कामकाज सुरू झाले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशा पद्धतीचे वातावरण अधिसभेच्या बैठकीत पाहायला मिळाले. जीवनसाधना गौरव पुरस्कार देताना विद्यापीठाची गरिमा सांभाळावी, अशी भूमिका आधिसभा सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. मात्र सभागृहाचे कामकाज कशा पद्धतीने चालावे यासंदर्भातील विसर सभागृहातील काही सदस्यांना राहिला नाही की काय? असा प्रश्न काही अनुभवी सदस्यांकडून उपस्थित केला गेला. अधिसभेत एकमेकांवर धावून गेल्यामुळे विद्यापीठाची गरीमा वाढली आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.