एससीईआरटी संचालक राहूल रेखावार यांची बदली;वासेकर यांनी स्वीकारली SCERT ची जबाबदारी 

 डॉ. एच.एस. वासेकर हे २०१५ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.त्यांनी आतापर्यंत प्रशासनात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

एससीईआरटी संचालक राहूल रेखावार यांची बदली;वासेकर यांनी स्वीकारली SCERT ची जबाबदारी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात SCERT चे संचालक राहूल रेखावार यांची बदली करण्यात आली आयएएस अधिकारी डॉ. एच. एस. वासेकर यांच्याकडे SCERT च्या संचालक पदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सोमवारी (दि.२)सकाळी त्यांनी संचालक म्हणून काम करण्यास सुरूवात केली.

शालेय शिक्षण विभागामध्ये महत्त्वाचे मानले जाणारे एससीईआरटी संचालक पदी गेल्या काही वर्षांपासून आयएएस अधिकारी नियुक्त केले जात आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण देणे, अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवणे आदी महत्वाची कामे SCERT तर्फे केली जातात. त्यामुळे येथे शिक्षण विभागातील अनुभवी अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे आयएएस अधिकारी नियुक्त केले जात आहेत.आयएएस अधिकारी राहूल रेखावार यांच्यानंतर पुन्हा एकदा प्रशिक्षण परिषदेच्या संचालक पदी आयएएस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

शिक्षण विभागातील अधिकारी यांना SCERT तर्फे केल्या जात असलेल्या उपक्रमांची व कामाची माहिती असते. त्यामुळे त्यांना SCERT मध्ये काम करणे अडचणीचे वाटत नाही. मात्र आयएएस यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा आवाका समजेपर्यंत त्यांची या पदावरून बदली होते.त्यामुळे SCERT च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांना अडथळा निर्माण होतो. गतीने ही कामे पुढे जात नाहीत. तसेच काही अधिकारी अट्टाहास करून काही धोरणात्मक निर्णय राबवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिक्षण विभाग हा प्रयोग करण्यासाठी आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

 डॉ. एच.एस. वासेकर हे २०१५ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.त्यांनी आतापर्यंत प्रशासनात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यापूर्वी प्रकल्प संचालक, SMART (State of Maharashtra's Agribusiness and Rural Transformation) या महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे संचालक म्हणून काम केले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM - उमेद): नवी मुंबई येथे कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण विकासाच्या योजनांवर भर दिला.त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग या पदावर असताना त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण विकास आणि प्रशासकीय कामात महत्त्वाची भूमिका बजावली.