लातूरमध्ये नवोदय विद्यालयात सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, कुटुंबियांकडून घातपाताचा संशय
नवोदय विद्यालयातील अभ्यासाचा ताण आणि अतिरिक्त दबावामुळेच विद्यार्थिनीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya) शिकणाऱ्या सहावीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू (Minor student dies) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवोदय विद्यालयातील अभ्यासाचा ताण आणि अतिरिक्त दबावामुळेच विद्यार्थिनीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला संशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनुष्का किरण पाटोळे (Anushka Kiran Patole's death) (वय १२ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मृत विद्यार्थिनीचा मृतदेह मुलींच्या वसतिगृहातील खोलीत पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही विद्यार्थिनी अत्यंत हुशार आणि चुणचुणीत असल्याचे सांगितले जात असून, तिने टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनेमुळे कुटुंबीयांसह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत विद्यार्थिनीचे वडील औसा तालुक्यातील टाका गावातील रहिवासी असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
हेही वाचा - सी.टी. बोरा कॉलेजच्या 152 विद्यार्थ्यांना TCS कंपनीमध्ये रोजगाराची संधी
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्या की घातपात, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे.
विद्यार्थिनी अनुष्काने जिथे गळफास घेतला त्या हॉलमध्ये दोन महिला कर्मचारी आणि १८ विद्यार्थिनी होत्या. कोणालाच कसे काय दिसले नाही? असा सवाल अनुष्काचे वडील किरणकुमार पाटोळे यांनी केला आहे; तसेच गावातील शिक्षक सुधाकर लोहकरे म्हणाले, अनुष्का ही हुशार विद्यार्थिनी होती. तिच्यावरील अन्याय प्रशासनाने दूर केला पाहिजे. रवी पाटील यांनी शाळेतील दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.
रुग्णालयाच्या परिसरात आक्रोश करणारे आई-वडील म्हणाले, 'सकाळी नऊ वाजता आम्हाला शाळेतून फोन आला. तुम्ही तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात या. काय झाले आहे, ते सांगितले नाही. लपवाछपवी केली. आम्हाला मृतदेहही दाखविला नाही. बसलेल्या स्थितीत गळफास कसा काय बसतो?' असा आईने उपस्थित केलाय.