बारावीचा निकाल २ मे ला जाहीर होणार; बोर्डाची अधिकृत घोषणा

बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या 2 मे रोजी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्य मंडळातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

बारावीचा निकाल २ मे ला जाहीर होणार; बोर्डाची अधिकृत घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या 2 मे रोजी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्य मंडळातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. 

राज्य मंडळाच्या नऊ  विभागीय मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाच्या खाली दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. https://hscresult.mkcl.org

4. https://results.targetpublications.org

5. https://results.navneet.com

6. https://www.tv9marathi.com

7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results.

ऑनलाईन निकालानंतर इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी येत्या रविवार दिनांक ०३/०५/ २०२६ ते रविवार दिनांक १७/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

 फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बारावी  परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

 फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

 जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरुन घेण्याच्या तारखांचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल,असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.