राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न; हे अंशत: खरे, अद्याप अंतिम निर्णय नाही
शैक्षणिक वर्ष या वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य मंडळांच्या शाळांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसईचा) बहुतांश अभ्यासक्रम स्विकारण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्याला लेखी उत्तर देताना हे अंशत: खरे आहे,असे उत्तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली, या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की याबाबत विचार विनिमय सुरू आहे, त्यामुळे सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा अंतिम निर्णय झालेला नसून शैक्षणिक सत्र 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयावरही अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आले नाही.
राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली असल्याचे माहे जानेवारी, २०२५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय ? , 'सीचीएसई' अंतर्गत असलेली पाठ्यपुस्तके इंग्रजी व हिंदी माध्यमात उपलब्ध आहेत, मराठीसह अन्य माध्यमांसाठी ती उपलब्ध करून दिली जाणार असून राज्य मंडळांच्या शाळांचे वार्षिक वेळापत्रक १५ जून पासून सुरु होत असून नवीन शैक्षणिक सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय? असे प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केले. त्यास दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले असून त्यात विचारण्यात आलेली माहिती अंशत: खरी असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील शाळांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहेत.त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र एप्रिल महिन्यात सुरू करणे शक्य होणार नाही.तसेच काही विषयांची पुस्तके सीबीएसईनुसार तयार करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. मात्र, त्यासंदर्भात आवश्यक तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी लागणार आहे.त्यामुळे सीबीएसईचा अभ्यासक्रम राज्य मंडळ स्वीकारणार असल्याची घोषणा झाली असली तरी ती अंशत: खरी आहे.
