जंगलाची वाट अन् विद्यार्थ्यांची पायपीट! पाठीवर दप्तराचे ओझे मनात वाघ, बिबट्यासह जंगली प्राण्यांची भीती

खंदाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जीवन संग्रामे, माणुसकीच्या नात्याने रोज काही मुलांना आपल्या दुचाकीवर शाळेत आणतात. मात्र, प्रत्येक मुलाला नेणे त्यांनाही शक्य नाही. स्थानिक प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मुलांचे शिक्षण आता धोक्यात आले आहे. मुलांनी जीव धोक्यात घालून जायचे किंवा अन्यथा शिक्षण सोडून देयचे, असाच एकच पर्याय समोर दिसून येत आहे. 

जंगलाची वाट अन् विद्यार्थ्यांची पायपीट! पाठीवर दप्तराचे ओझे मनात वाघ, बिबट्यासह जंगली प्राण्यांची भीती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र डिजिटल (Digital Maharashtra) होत असल्याच्या गप्पा मारल्या जात असताना, भंडारा जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारे वास्तव समोर आले आहे. तुमसर तालुक्यातील खैरटोला येथील चिमुरड्यांना खंदाळ येथे शाळेत (Khandal Zilla Parishad School) जाण्यासाठी रोज अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. पण हे अंतर साधेसुधे नाही. हे अंतर आहे वाघ, बिबट्या आणि अस्वलांच्या (Fear of Tigers, Leopards, and Bears) साम्राज्यातून जाणारे! पाठीवर दप्तराचे ओझे आणि मनात मृत्यूची धास्ती घेऊन ही मुले रोज शिक्षणाची जिद्द उराशी बाळगून घराबाहेर पडतात. मात्र, कधी कोणता प्राणी त्यांच्यावर हल्ले करेल, आणि कधी त्यांच्यासोबत विघटीत घडेल या चिमुकल्यांना माहिती पण नाही. 

खैरटोला ते खंदाळ हा अडीच किलोमीटरचा रस्ता घनदाट जंगलातून जातो. इथे अस्वल, रानटी डुकर आणि बिबट्यांचा मुक्त वावर आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडील जेव्हा मजुरीला जातात, तेव्हा ही लहान मुले देवाच्या भरवशावर या जंगलातून एकटीच प्रवास करतात. कधी कधी कुणी अज्ञात दुचाकीस्वार लिफ्ट देतो, तर कधी चक्क शाळेचे मुख्याध्यापकच या मुलांसाठी देवदूत बनून धावून येतात.

खंदाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जीवन संग्रामे, माणुसकीच्या नात्याने रोज काही मुलांना आपल्या दुचाकीवर शाळेत आणतात. मात्र, प्रत्येक मुलाला नेणे त्यांनाही शक्य नाही. स्थानिक प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मुलांचे शिक्षण आता धोक्यात आले आहे. मुलांनी जीव धोक्यात घालून जायचे किंवा अन्यथा शिक्षण सोडून देयचे, असाच एकच पर्याय समोर दिसून येत आहे. 

आता प्रश्न उरतो तो प्रशासनाचा! उद्या जर एखाद्या चिमुरड्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला, तर त्याचं पाप कोणाच्या माथी असेल? मजुरी करणाऱ्या पालकांनी मुलांचं शिक्षण बंद करावं का? बस थांबत नाही आणि रस्ता सुरक्षित नाही, अशा दुहेरी कात्रीत हे विद्यार्थी अडकले आहेत. आता तरी जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग या चिमुरड्यांच्या जीवासाठी आपली झोप मोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.