आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर; तुमच्या पाल्याला प्रवेश मिळाला का ?
लॉटरीच्या माध्यमातून 552 दिव्यांग विद्यार्थ्यांची तर सर्वसाधारण संवर्गातील एक लाख 5 हजार 229 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तीस दिव्यांग विद्यार्थी व 86 हजार सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेची लॉटरी जाहीर झाली असून पालक आपल्या पाल्याला लॉटरीतून प्रवेश मिळाला आहे किंवा नाही हे https://student.maharashtra.gov.in/adm_portal या आरटीई पोर्टलवर जाऊन तपासू शकतात. लॉटरीच्या माध्यमातून 552 दिव्यांग विद्यार्थ्यांची तर सर्वसाधारण संवर्गातील एक लाख 5 हजार 229 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तीस दिव्यांग विद्यार्थी व 86 हजार सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत, असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
आर टीई प्रवेशाची लॉटरी 6 एप्रिल रोजी काढण्यात आले. त्यानुसार प्रवेशास पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस त्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे पाठविण्यात आले आहेत. मात्र पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता पोर्टलवर जाऊन सोडत मध्ये निवड झाली आहे किंवा नाही याची तपासणी करावी. सोडत द्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी येथे जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी पडताळणी समितीमार्फत करावी. पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणित केल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रत देण्यात यावे. 25% आरक्षित जागांवर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश 11 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत निवड यादीतील पालकांनी आपले प्रवेश निश्चित करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे राज्यातील 8701 शाळांमधील एक लाख 14 हजार 826 जागांसाठी दोन लाख 89 हजार 385 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जातून लॉटरी काढून विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.