धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदनिर्मितीस मान्यता, लवकरच नवीन पदभरती होणार

धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास त्यांना वेळेत उपचार मिळणे, ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदनिर्मितीस विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदनिर्मितीस मान्यता, लवकरच नवीन पदभरती होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

धर्मादाय रुग्णालयांमध्ये (Charitable Hospital) दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास त्यांना वेळेत उपचार मिळणे, ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदनिर्मितीस (Charitable Arogya Sevak Recruitment) विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मान्यता दिली आहे. यासाठी बाह्यस्त्रोता द्वारे लवकरच नवीन पदभरती केली जाणार आहे. ही पदे धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहेत. 

धर्मादाय रुग्णालये योजनेची अंमलबजावणी करीत असतांना सद्यस्थितीत संबंधित धर्मादाय रुग्णालयांमार्फतच वैद्यकीय समाजसेवकाची नेमणूक करण्यात येत होती. हा समाजसेवक रुग्णालयाचा प्रतिनिधी असल्याने त्यांच्यामार्फत रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची उचित माहिती न मिळणे, अनावश्यक कागदपत्रे मागणे, योजनेंतर्गत उपचार करण्यास टाळाटाळ करणे आदी बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मादाय रुग्णालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मदत कक्षाची स्थापना, ऑनलाईन प्रणाली, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनसह आरोग्य सेवकांची पदभरतीची सुधारणा केली आहे. मात्र, अपेक्षित बदल न झाल्याने आता धर्मादाय आरोग्य सेवकांच्या पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. 

या पदनिर्मितीचा मुख्य हेतू हा रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना योजनेची योग्य माहिती देणे. त्यांच्यावर केवळ आवश्यक कागदपत्रांच्या आधारे उपचार करण्यात येतील अशी सोय करणे. खऱ्या गोर-गरीब गरजू रुग्णांना योजनेनुसार उपचार मिळणे सुलभ होईल. धर्मादाय रुग्णालयाकडून रिक्त खाटांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर देण्यात येईल. यांसारख्या सर्व गोष्टींवर धर्मादाय आरोग्य सेवक लक्ष ठेवतील. यामुळे योजनेची अधिक प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.